‘पेयजल’ची सीबीआय चौकशी करा
By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-27T23:55:13+5:302015-05-28T00:58:37+5:30
करवीर पंचायत समिती सभा : अर्जुन पाटील यांची मागणी

‘पेयजल’ची सीबीआय चौकशी करा
कसबा बावडा : गेल्या पाच वर्षांत तालुक्यात झालेल्या एकूण ‘पेयजल’ योजनेपैकी निम्म्यांहून अधिक योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या पेयजल योजनेच्या कामाची ‘सीबीआय’ चौकशी करावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत अर्जुन पाटील यांनी केली. अध्यक्षस्थानी सभापती पूनम महेश जाधव होत्या. पेयजल योजनेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम, निकृष्ट पाईपलाईन टाकल्यामुळे अवघ्या दीड ते दोन वर्षांतच या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही अर्जुन पाटील यांनी केली. या कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिले. सचिन पाटील यांनी शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला. या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सध्या ग्रामपंचायतीचा घरफाळा वसुली बंद आहे. ती क्षेत्रफळावर आधारित सुरू करावी, अशी मागणी केली. पाचगावमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाचगावचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली.
दिलीप टिपुगडे यांनी कर
वीर पंचायतमध्ये आदी खर्च आणि नंतर मंजुरी, असा कारभार चालत असल्याचा आरोप केला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या आदीच पैसे खर्च टाकण्याचा आरोप केला. मात्र, गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी तो फेटाळून लावला.
तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून ४०० ते ४५० कृषीपंप जोडण्या प्रलंबित आहेत. वीज वितरणने या जोडण्या त्वरित जोडाव्यात, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण व खड्डे मुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जयसिंग काशीद व सरदार मिसाळ यांनी केली. भूजगोंडा पाटील यांनी आभार मानले. सभापती पूनम जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सभेच्या प्रारंभी पाचगावच्या गायत्री दत्तात्रय सुर्वे हिची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल व सतीश दत्तात्रय सुर्वे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल समितीच्यावतीने सत्कार झाला.