जातीव्यवस्था नष्ट व्हावी
By Admin | Updated: August 26, 2015 22:50 IST2015-08-26T22:50:19+5:302015-08-26T22:50:19+5:30
जोगेंद्र कवाडे : मालवणात फुले, शाहू आंबेडकर विचारमंच कार्यक्रम

जातीव्यवस्था नष्ट व्हावी
मालवण : आजही दलित समाजाचे चित्र धुसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आशावादी बनविले. जातीय अन्याय होत आहे म्हणून समाजाने संघर्ष करणे थांबवू नये. बाबासाहेबांनी आकाशाला गवसणी घालण्याचे पंख दिले आहेत. देशात समता, एकात्मता प्रस्थापित झाली तर जात व वर्ण व्यवस्था समूळ नष्ट होईल. डॉ. बाबासाहेबांचे कार्य देशासाठी सन्मानाचे होते. जातीव्यवस्था नष्ट होऊन बाबासाहेबांच्या विचारांचे राज्य आल्यास आपला भारत देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त येथील डॉ. श्रीधर कुडाळकर हायस्कूल सभागृहात मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. कवाडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. डी. बनसोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद जाधव, शाहू, फुले विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे, प्रा. खरात तसेच सचिव राजेंद्र कदम, सिद्धू जाधव, बबन मालवणकर, रवी मालवणकर, नरेश वायंगणकर, पुरुषोत्तम मालवणकर, श्रीकांत मालवणकर, कुडाळकर हायस्कूलच्या दर्शना गुळवे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चव्हाण यांनी तर आभार सूर्यकांत कदम यांनी मानले. (प्रतिनिधी)
...तर घराघरात बाबासाहेब घडतील
भारताची राज्यघटना देशात महान आहे. आपण ज्या देशात राहतो, त्या देशाच्या राज्य घटनेचा अभ्यास प्रत्येकाने केलाच पाहिजे. बाबासाहेबांनी घटनेत दलित समाजाच्या अगोदर ३४0 व्या कलमात ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर ३४१ वे कलम दलितांच्या आरक्षणाचे लिहिले. आज देशाने बाबासाहेब ओळखणे गरजेचे आहे. महामानवाने देशातील हरएक व्यक्तीचा विचार करून घटना लिहिली. जेव्हा घटनेतील कर्तव्यांची जाणीव देशाला होईल तेव्हा घराघरात आंबेडकरांची पूजा होईल असे प्रा.कवाडे म्हणाले.
दलितांनी चळवळ व्यापक बनवावी
आज दलित समाज विखुरला जात असल्याची खंत व्यक्त केली. आज दलित चळवळीची बेटे तयार झाली आहेत. या बेटांचे एकत्रिकरण होणे काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना उद्धारासाठी संघर्षाची लढाई करणे शिकविले आहे. समाजाच्या हितासाठी लढणारी पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. निराशेला दफन करून एकजुटीने समाजासाठी एकत्र यायला पाहिजे, असेही प्रा. कवाडे म्हणाले.
शिवाजी महाराजांचा इतिहास लपविला गेला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक पाने आपल्यासमोर आलेली नाहीत. छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या अनेक गोष्टी समोर आलेल्याच नाहीत. ते रयतेचे राजा असले तरी त्यांना क्षुद्र ठरविण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबियांबद्दलही माहिती पुढे करण्यात आली नाही, हा इतिहास बाबासाहेब पुरंदरेनी का लपविला? असा सवालही कवाडे यांनी उपस्थित केला. यामुळे छत्रपतींचा संपूर्ण इतिहास नव्याने अभ्यासून आताच्या पिढीसमोर मांडण्याची वेळ आली आहे, असेही प्रा. कवाडे म्हणाले.
देश जातीयवादी होतोय
प्रा. कवाडे म्हणले, आज देश महासत्तेकडे वाटचाल करीत असताना देशात मात्र जातीयवाद फोफावत चालला आहे. माणूस दगड बनल्याने दगडाचे देव झाले. देशाची राज्यघटना बदलण्याचे वर्णवादी लोकांनी षड्यंत्र रचले होते. मात्र, संसदेत प्रा. कवाडे यांनी राज्यघटना बदलणाऱ्यांचे हात छाटून टाकू असे ठणकावले होते.