अवजड वाहनांचे ‘अवघड’ दुखणे!

By Admin | Updated: August 26, 2015 00:36 IST2015-08-26T00:36:47+5:302015-08-26T00:36:47+5:30

वाहतूक शाखेची डोळेझाक : आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार का ?

Carrier vehicles 'difficult' pain! | अवजड वाहनांचे ‘अवघड’ दुखणे!

अवजड वाहनांचे ‘अवघड’ दुखणे!

प्रदीप शिंदे- कोल्हापूरअवजड वाहनांना वाहतुकीसाठी दुपारी साडेबारा ते साडेचार या वेळेव्यतिरिक्त शहरात प्रवेश करण्यास बंदी असतानासुद्धा वाहतूक शाखेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ही अवजड वाहने शहरातून सर्रास फिरताना दिसतात. पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक शाखेस जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
शहरातून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दुपारी बारा ते चार ही वेळ नियोजित करण्यात आली आहे. मात्र, हा नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र सध्या शहरात पाहण्यास मिळते. अनेक अवजड वाहने केव्हाही शहराच्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना दिसतात. वाढत्या अतिक्रमणाने मोठे रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. त्यातच शहरातून अवजड वाहनांची वाहतूक बेलगामपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून जावे लागते. शहरात या प्रकारामुळे अपघातांमध्ये तर वाढ होत आहेच; पण वाहतुकीस अडथळेही होत आहेत.
एखाद्या वेळी दुचाकी वाहन पार्किंगमध्ये न लावल्यास त्यांच्यावर वाहतूक शाखेच्यावतीने तत्काळ कारवाई केली जाते. त्यांना ही अवजड वाहने कशी दिसत नाहीत, असा प्रश्न सामान्य लोकांना पडतो आहे. या जड वाहनांना कोणत्याच प्रकारे निर्बंध का लावले जात नाहीत, अशी विचारणा वाहनधारकांमधून होत आहे.
वाहतुकीचे नियोजन फक्त रस्ता सुरक्षा अभियानापुरतेच न करता कायमपणे राबविणे गरजेचे आहे. याची जबाबदारी महापालिका, शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागांची असून, त्यांनी या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे.
माफक दंडामुळे मनमानी
शहरात प्रवेश करण्यासाठी ठरावीक वेळ दिली असताना अनेक अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यांच्यावर प्रवेशबंदीचे उल्लंघन म्हणून कारवाई करताना फक्त शंभर रुपयांची पावती केली जाते. या रकमेत वाढ केल्यास या वाहतुकीस नक्कीच आळा बसेल. तसेच अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी धडक मोहीम राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवघेणे अपघात तरी कमी होतील.

शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहने ने-आण करण्यास बंदी आहे. शहरात फक्त दुपारी साडेबार ते साडेचार या वेळेत अवजड वाहन प्रवेश करण्यास परवानगी आहे. तसेच सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे प्रलंबित आहे. मात्र, याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना प्रवेश केल्याबद्दल अनेकवेळा आम्ही कारवाई केली आहे.
- आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Carrier vehicles 'difficult' pain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.