भ्रष्टाचार केल्यास पद रद्द
By Admin | Updated: September 1, 2015 00:16 IST2015-09-01T00:16:17+5:302015-09-01T00:16:17+5:30
चंद्रकांतदादा पाटील : भाजप-ताराराणी आघाडीचा संवाद-प्रतिसंवाद

भ्रष्टाचार केल्यास पद रद्द
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता आणणारच अन् ती भ्रष्टाचारमुक्त असेल, सत्तेतील एखादा नगरसेवक भ्रष्टाचारी आढळल्यास त्याचा आम्ही तातडीने राजीनामा घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी आघाडीच्या ‘आपल्या कोल्हापूरसाठी’ या संवाद-प्रतिसंवादात दिली; पण सत्तेत आल्यानंतर महापौरपदाच्या होणाऱ्या खांडोळीबाबतच्या भूमिकेबाबत मात्र त्यांनी मौन पाळले.महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रिपाइं यांच्या आघाडीच्यावतीने जाहीरनामा तयार करण्यासाठी ‘आपल्या कोल्हापूरसाठी’ या संवाद-प्रतिसंवादाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. त्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे एक हजार नामवंतांना यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी उपस्थितांतून आलेल्या अपेक्षांवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार राजू शेट्टी यांनी व्यासपीठावरून उत्तरे दिली. या प्रतिसंवादामध्ये रंकाळा प्रदूषण, घनकचरा, पंचगंगा प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, पार्किंग, थेट पाईपलाईन आदी विषयांवर अनेकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. सुनील मोदी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. अपेक्षा मांडताना अनेकांनी, महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त सत्ता गरजेची असल्याचा उल्लेख केला. यावेळी पालकमंत्र्यांनी नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबाबत नागरिकांतून तक्रार आल्यास त्याचा तातडीने राजीनामा घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.खासदार राजू शेट्टी म्हणाले, आलेल्या सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश असेल. शहराचे अनेक जटिल प्रश्न आहेतच ते सोडविण्याबरोबरच भ्रष्टाचारमुक्त कारभार कसा करता येईल यासाठी आम्ही विचार करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू.
शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक, उपाध्यक्ष सुहास लटोरे, सुनील कदम, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, सत्यजित कदम, नंदकुमार वळंजू तसेच आयोजक मिलिंद धोंड उपस्थित होते.
उपस्थितांनी मांडलेले प्रश्न
४उदय दुधाणे (गोशिमा अध्यक्ष) : शहरातील उद्यान विकसित करावीत, हद्दवाढ करताना उद्योजकांचा विचार करून औद्येगिक वसाहतीला वगळावे.
४पारस ओसवाल : कोल्हापुरात विविध विकास योजना राबविताना त्यात पारदर्शीपणा नसतो, प्रत्येकजण मलई शोधतो. त्यामुळे काळ्या यादीत गेलेल्या ठेकेदारांना कामे दिली जातात याचाही विचार व्हावा.
४डॉ. निरंजन शहा : वैद्यकीय व्यवसायातील विविध परवान्यांसाठी डॉक्टरांना फिरावे लागते, ती समस्या दूर करावी.
४किशोर कृपलानी : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर मार्ग काढावे, रस्त्यावर कॅमेरे लावून तीन चुका करणाऱ्या परदेशातील नियमांप्रमाणे कारवाई करावी.
४भाग्यश्री कलगुटकी : पंचगंगा प्रदूषण हे जयंती नाल्यामुळे होते, हे प्रदूषण कमी करण्यासाठी नाल्याशेजारी झाडे लावावीत.
४उदय गायकवाड (पर्यावरणप्रेमी) : कोल्हापूर हे कोंडाळेमुक्त शहर असावे, सांडपाणीमुक्त नाला असावा हे आपण करू शकतो. आपत्ती व्यवस्थापनाबाबत इतर जिल्ह्यातील आराखडा पाहून तज्ज्ञांची मते घेऊन तो अंमलात आणावा.
४याशिवाय उद्योजक भैया घोरपडे, प्रदीपभाई कापडिया, गणेश बालम, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, आकाराम पाटील, बाबा इंदूलकर, मधुकर मांडवकर, राजश्री निंबाळकर, उमा इंगळे, अॅड. विजय महाजन, सुभाष नियोगी, अमरजा निंबाळकर, किरण कर्नाड आदींनी विविध प्रश्न मांडले.