खरेदीदारांकडूनच अडत घेण्याचे आदेश
By Admin | Updated: December 21, 2014 00:12 IST2014-12-20T23:52:10+5:302014-12-21T00:12:18+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : पणन संचालकांचा नवा आदेश लागू

खरेदीदारांकडूनच अडत घेण्याचे आदेश
प्रकाश पाटील / कोपार्डे
गुळासाठी तीन टक्के, कांद्यासाठी अडते अथवा दलालांना द्यावी लागणारी अडत आता खरेदीदाराकडून वसूल करण्याचा आदेश पणन संचालकांकडून बाजार समितीला प्राप्त झाला आहे. यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी, तर कांदा उत्पादकांचे १८ ते २० कोटी वार्षिक वाचणार आहेत.
बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा तो सरळ ग्राहकांना अथवा व्यापाऱ्यांना विकत नसे, तर दलालामार्फत अथवा अडत्याकरवी त्याची विक्री व्यापाऱ्यांना होत असे. त्या बदल्यात त्या मालाच्या पैशाची हमी अडत्यावर असे. मात्र, गूळ व काही शेतीमालावरील नियमन रद्द करत अडतही रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांना पैशाची हमी व गूळ व कांद्यासारख्या नाशवंत मालासाठी गोदाम मिळत नसल्याने अडचणीत आला होता. अलीकडेच शासनाने नियमन पुन्हा सुरू केले आहे. तसेच आजच अडत व दलाली-बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन गूळ उत्पादक व शेतकऱ्यांना दिलासा आहे.
पणन संचालकांचा बाजार समितीला सायंकाळी सहा वाजता गूळ व कांद्याबद्दल शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारी अडत अथवा दलाली शेतकऱ्यांकडून न घेता
ती खरेदीदारांकडून म्हणजे व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, अशा आदेशाचा मेलच बाजार समितीला प्राप्त झाला आहे.
शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी रुपये वाचणार
दरवर्षी बाजार समितीमध्ये गुळाची ३०० कोटींची उलाढाल होते. गुळासाठी अडते किंवा दलाल तीन टक्केप्रमाणे अडत अथवा दलाली घेतात. याचा विचार केल्यास किमान १० ते १२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे गुळासाठी वाचणार आहेत, तर कांद्याची उलाढाल ४०० कोटींची होत असल्याने यामध्ये सहा टक्केप्रमाणे किमान १८ ते २० कोटी अडत अथव दलाली शेतकऱ्यांची वाचणार आहे. शासनाने प्रथम नियमन कायम करून विक्री झालेल्या शेतमालाच्या पैशाला हमी तर अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या आदेशाने गूळ दर घसरणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.