अर्थसंकल्पातील संकल्प कागदावरच

By Admin | Updated: January 9, 2015 00:24 IST2015-01-09T00:20:26+5:302015-01-09T00:24:42+5:30

मागोवा अर्थसंकल्पाचा : पंचगंगा नदीप्रदूषणासह घनकचरा प्रक्रिया ‘जैसे थे’

Budget resolution on paper | अर्थसंकल्पातील संकल्प कागदावरच

अर्थसंकल्पातील संकल्प कागदावरच

संतोष पाटील - कोल्हापूर -शहरातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि शहरातील घनकचरा निर्गतीचा गंभीर प्रश्न याचा प्राधान्याने विचार करून, त्यातून मार्ग काढण्याचा महानगरपालिका प्रशासनाने या वर्षाच्या अंदाजपत्रकात केलेला संकल्प अद्याप कागदावरच आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र व घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करून सहकार्य केले. मात्र, प्रशासकीय ढिलेपणामुळे प्रकल्प ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी
५० कोटींची तरतूदही प्रशासनाने केली असली तरी यासाठी राजकीय पाठबळ अपुरे पडत आहे.
शहरातील विविध भागांतून वाहणाऱ्या १२ नाल्यांतील सांडपाणी अडवून ते दुधाळी व कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेने हाती घेतला. त्यासाठी राज्य सरकारच्या ‘सुजल निर्मल अभियान’ या योजनेतून निधी आला. कसबा बावडा येथील ७५ कोटींचा ७६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प दुसऱ्या टप्प्यातच गटांगळ्या खात आहे; तर दुधाळी येथील २६ एमएलडी प्रकल्पाची सुरुवातच झालेली नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी टाकाळा येथे शास्त्रोक्त भूमी भराव क्षेत्र विकसित करण्यासाठी ६ कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली असली तरी काम कासवगतीनेच सुरू आहे.
शहर विकासाला तसेच रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून, त्याकरिता शहरात पाच एकर जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा प्रशासनाने केली. प्रत्यक्षात माहिती तंत्रज्ञान केंद्रासाठी मुहूर्तच सापडलेला नाही. शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा सविस्तर आराखडा तयार झाला. महापालिकेचा हिस्सा म्हणून ५० कोटींची तरतूद केली. मात्र, राजकीय अनास्थेमुळे प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही. हीच अवस्था रंकाळा संवर्धनाची आहे. प्रदूषणामुळे रंकाळ्यास अवकळा आली आहे. संरक्षक कठडे कोसळून सहा महिने होऊनही दुरुस्तीसाठी हालचाली नाहीत.
एकूणच अर्थसंकल्पावेळी प्रशासनाने केलेल्या घोषणा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही सत्रातही जैसे-थे असल्याचे चित्र आहे.


शाहू स्मारकासाठी राजकीय पाठबळ पडतय अपुरे
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कसबा बावड्यातील प्रकल्प गटांगळ्या खातोय, दुधाळीतील प्रकल्पाला मुहूर्र्तच नाही.
टाकाळा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम कासवगतीने
माहिती तंत्रज्ञान केंद्रास मुहूर्तच सापडेना.
रंकाळा तलावाचे संरक्षक कठडे कोसळून सहा महिने होऊनही दुरुस्तीसाठी हालचाली नाहीत.


२०१४ /१५ तील संभाव्य जमा व खर्च
जमा (आकडे कोटींत)
२२९ कोटींचे उद्दिष्ट. पहिल्या नऊ महिन्यांत ५० कोटींची तूट
एलबीटी - ९५ , मिळकत कर - ३७.२४ , मार्के ट भाडे - ८.८२ , नगररचना - ३६.५९ ,पाणी हशील - ४९.०३ ,शासकीय अनुदान १९.८०, संकीर्ण जमा - १३.३४


खर्च (आकडे कोटींत)
५५०० कर्मचारी. महिन्याला
१२ कोटी पगाराचा खर्च
आस्थापना खर्च, पेन्शन व मानधन - १५९.०५, प्राथमिक शिक्षण मंडळ - २५.००, विद्युत खर्च- २६.१०, रस्तेदुरुस्ती - २.११ , पाणीपट्टी - ३.३५.

Web Title: Budget resolution on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.