संरक्षण व्याप्ती वाढविणारे 'बजेट'
By Admin | Updated: July 20, 2014 00:08 IST2014-07-20T00:00:14+5:302014-07-20T00:08:59+5:30
चंद्रशेखर टिळक : काश्मीर, मणिपूर, मिझोराम, नागालँडला झुकते माप

संरक्षण व्याप्ती वाढविणारे 'बजेट'
कोल्हापूर : यंदाच्या अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी सरकारने प्रथमच काश्मीर, अरुणाचल, मिझोराम, नागालँड या राज्यांना झुकते माप दिले. हे देण्याचे कारण म्हणजे येथे भविष्यात संरक्षणाच्या दृष्टीने मोठी गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीवर जागतिक स्तरावरही आपण चीनच्या पुढे जाणार आहोत. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे संरक्षण व्याप्ती वाढविणारा व देशाला प्रगतीपथावर नेणारा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.
प्रेस्टीज कन्सलटंन्सी सर्व्हिस व भारती विद्यापीठ यांच्यावतीने आज, शनिवारी रामभाई सामाणी हॉल येथे आयोजित ‘अर्थसंकल्प २०१४-१५’ या व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठचे संचालक डॉ. व्ही.एम. चव्हाण होते. व्ही. आर. आद्ये यांनी प्रास्ताविक केले.
टिळक म्हणाले, या अर्थसंकल्पात कधी नव्हे, ती काश्मीर निर्वासितांसाठी ५०० कोटींची तरतूद केली. याचबरोबर मणिपूर येथे क्रिडा विद्यापीठाची तरतूद केली. कारण या राज्यांतून आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पदके आली आहेत. हे राज्य चीनला जवळचे आहे. याशिवाय मिझोराम येथे हार्टिकलचरल विद्यापीठ, नागालँड येथे महत्त्वाचे केंद्र आदी, तरतूद केली. ही चारही राज्ये भविष्यात देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रेल्वेने जोडली जाणार आहेत. कारण येथून निर्वासित झालेले नागरिक पुन्हा या राज्यात येणार आहेत. मिझोराम व नागालँड संत्री, अननस आणि पपई निर्यात देशातील सर्वांत जास्त निर्यात करणारे राज्य आहे. या क्षेत्रात नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात आहे. हा देशाला सातवर्षे पुरणारा आहे. याचा एकत्रित विचार करून या सरकारने ही तरतूद केली आहे. संरक्षण साहित्याबाबत अमेरिका, रशिया आता आपल्याला जवळ करीत नाहीत. त्यामुळे जर्मनीसारख्या देशांना आपल्याला चुचकारावे लागत आहे. यासाठी एफडीआयसारखा पर्यायाला अर्थसंकल्पात स्थान देणे क्रमप्राप्त झाले आहे.
देशातील संपूर्ण संचित पैसा चलनात आणण्यासाठी पोस्ट खात्याला बँकेची परवानगी देऊन देशाला ३५ हजार लाख जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचबराबेर जाणीवपूर्वक पॅनकार्ड सर्व ठेवींबाबत सक्तीचे केले आहे. या पॅन क्रमांकावर ग्राहकांच्या ठेवी एका क्षणात समोर येणार आहेत. यापुढे देशातील सर्व राज्ये केंद्राला पैसा पुरवतील, असा अर्थसंकल्प मोदी सरकारने दिला आहे. यावेळी डॉ. पी. एस. कुलकर्णी, बाबाभाई वसा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)