नाराजांची भूमिका ठरणार निर्णायक
By Admin | Updated: May 11, 2016 00:54 IST2016-05-10T22:48:31+5:302016-05-11T00:54:01+5:30
पेरणोली-गवसे गट : मातब्बरांविरोधात नवख्यांनी ठोकला शड्डू

नाराजांची भूमिका ठरणार निर्णायक
ज्योतीप्रसाद सावंत--आजरा --३० गावांचा समावेश असणाऱ्या गवसे-पेरणोली उत्पादक गटामध्ये आजरा साखर कारखाना निवडणुकीकरिता चराटी-केसरकर यांच्या आघाडीतून दशरथ अमृते, इंद्रजित देसाई व राजू सावंत या नवख्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात आणले गेले आहे. तर राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीने उदय पवार, सुधीर देसाई या विद्यमान संचालकांसह माजी संचालक सदाशिव डेळेकर यांना संधी देऊन नेटके आव्हान उभारले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असणाऱ्या मंडळींची भूमिका या गटात महत्त्वाची ठरणार आहे.सर्वच पक्षांचे, संघटनांचे कार्यकर्ते या गटात आहेत. कारखाना कार्यक्षेत्र असणाऱ्या गवसे येथून दोन्ही प्रमुख आघाड्यांतून उमेदवारी नाही. ४०० मतदान असणाऱ्या खेडे या गावाचीही अवस्था फारशी वेगळी नाही. सहदेव नेवगे, श्रीपतराव देसाई, शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मातब्बर या गटातून इच्छुक होते. डॉ. इंद्रजित देसाई यांनी तर प्रचारही सुरू केला होता. या सर्वांची भूमिका आता काय राहणार यावरही येथील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
साखर कारखाना राजकारणात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या देवर्डे येथूनही उमेदवारी देण्यात यावेळी मुख्य आघाड्यांना अपयश आले आहे. तालुका खरेदी-विक्री संघ, आजरा सूतगिरणी, जनता बँक येथे नेतृत्व करणारी मंडळी या गावात असूनही कारखान्याबाबत उपेक्षाच देवर्डेकरांच्या पदरी आली आहे.
अशोकअण्णा चराटी यांचे कट्टर समर्थक दशरथ अमृते, स्वाभिमानीचे इंद्रजित देसाई व शिवसेनेचे राजू सावंत हे प्रथमच कारखाना निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर विरोधातील सुधीर देसाई, उदय पवार व सदाशिव डेळेकर यांनी संचालकपदाचा अनुभव यापूर्वी घेतला आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीत माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचा गटही मिसळल्याने राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेस थोडी
वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.