दोन्ही काँग्रेसचे ‘ताराराणी’च टार्गेट

By Admin | Updated: August 10, 2015 01:07 IST2015-08-10T01:07:24+5:302015-08-10T01:07:24+5:30

महापालिका निवडणूक : ३०-३० जागांवरच लक्ष केंद्रित करून सारी ताकद लावणार

Both the Congress 'Tararani' targets | दोन्ही काँग्रेसचे ‘ताराराणी’च टार्गेट

दोन्ही काँग्रेसचे ‘ताराराणी’च टार्गेट

राजाराम लोंढे - कोल्हापूर महापालिकेची निवडणूक सध्या चौरंगी वाटत असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे खरे टार्गेट ताराराणी आघाडीच आहे. ‘ताराराणी’च्या कारभाऱ्यांचे निवडणुकीतील डावपेच माहिती असल्याने दोन्ही काँग्रेसने त्याच पद्धतीने आपली चाचपणी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांनी सर्व ८१ जागा लढविण्याचा निर्धार केला असला तरी ‘ताराराणी’ला रोखण्यासाठी ३०-३० जागांवरच अधिक लक्ष केंद्रित करून तिथेच सारी ताकद लावली जाणार आहे.
गेली पाच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य सत्तेत होती. या निवडणुकीतहीही आघाडी कायम राहिली असती, पण इच्छुकांची नाराजी अंगावर ओढवून त्याचा फायदा विरोधकांना होईल, या भीतीनेच दोन्ही काँग्रेस विशेषत: आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वबळाचा शड्डू ठोकला. त्यात शिवसेना व भाजपने सवतासुभा केल्याने चौरंगी लढत निश्चित आहे. कोणत्याही एका पक्षाला सत्तेची ‘४१’ फिगर गाठणे कठीण आहे.
महापालिकेच्या राजकारणातील मुरब्बी म्हणून ‘ताराराणी’ आघाडीकडे पाहिले जाते. या आघाडीने भाजपबरोबर हातमिळवणी केल्याने शिवसेनेला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असली तरी नेत्यांचे अजून मलोमिलन व्हायचे आहे. सतेज पाटील यांनीच चाचपणी सुरू केली असून, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती अजून पडद्यामागेच आहेत. आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात समझोता करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रयत्न असला तरी ते अशक्य आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना सोबत घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व्हेच्या माध्यमातून चाचपणी सुरू केली आहे. प्रभागात इच्छुकांपैकी पहिल्या तीनजणांशी चर्चा सुरू आहे.
गत निवडणुकीत राष्ट्रवादीला २५ ठिकाणी यश मिळाले, तर त्यांचे बारा उमेदवार थोडक्या मताने पराभूत झाले. अशा ४० जागांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. उर्वरित ठिकाणी ताकदीचे नवीन चेहरे मिळतात का? यासाठी फासे टाकले जात आहेत. एकंदरीत राजकीय आडाखे पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर भाजप-ताराराणी आघाडीचेच खरे आव्हान आहे. त्यामुळे ‘ताराराणी’च्या हालचालीवर दोन्ही काँग्रेसचे लक्ष आहे.


६०-२१ चा फॉर्म्युला
राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य पक्षामध्ये आघाडी निश्चित झाली असली तरी जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही गत निवडणुकीतील प्रभाग, इच्छुकांची संख्या पाहून राष्ट्रवादी ६०, तर जनसुराज्य २१ ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे
विद्यमानांना सिग्नल
राष्ट्रवादीच्या विद्यमान २५ नगरसेवकांपैकी बुहतांशी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. नवीन प्रभागाचा अंदाज घेऊन विद्यमान नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहेत.

सत्तेविना दोन्ही काँग्रेस रिंगणात
गत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात व केंद्रात सत्तेत होती. त्यामुळे निवडणूक त्यांना सोपी गेली होती. सत्तेत असल्याने ‘ताकद’वान उमेदवार मिळालेच, त्याचबरोबर पक्षाकडूनही चांगली रसद पुरविली होती, पण आता सत्तेविना दोन्ही काँग्रेस रिंगणात उतरल्याने ८१ जागांवर ताकदीने निवडणूक लढविणे तितकेसे सोपे राहिले नाही.

Web Title: Both the Congress 'Tararani' targets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.