शिक्षक बँकेत ‘गुरुजीं’च्या राजकारणाला उकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:40+5:302021-09-11T04:24:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांनी शिक्षक संघाच्या हातात सत्तेच्या चाव्या देत असताना पाच विरोधी संचालकांनाही ...

शिक्षक बँकेत ‘गुरुजीं’च्या राजकारणाला उकळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांनी शिक्षक संघाच्या हातात सत्तेच्या चाव्या देत असताना पाच विरोधी संचालकांनाही कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी पाठवले होते. मात्र दुसऱ्या वर्षापासूनच विरोधकांनी तलवार म्यान करून संचालक मंडळांच्या सभेत सुरात सूर मिसळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ज्या नोकरभरतीवर विरोधक आक्रमक झाले आहेत, मात्र या भरतीत विरोधी संचालकांनीही आपले कर्मचारी दिले. त्यावेळी बँकेच्या हिताचा विसर पडलेले विरोधी संचालक आताच आक्रमक कसे झाले? हा प्रश्न सभासदांना पडला आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण नवीन नाही. या राजकारणामुळेच बँक आर्थिक अरिष्टात सापडली होती. मागील दहा-बारा वर्षांपासून बँकेची आर्थिक घडी बसत गेली. आतापर्यंत सभासदांनी शिक्षक संघाच्या बाजूने कौल देत असताना कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी संचालकांनाही तिथे पाठवले, हे येथील सभासदांचे वैशिष्ट्य आहे. मागील निवडणुकीत शिक्षक संघाला (राजाराम वरुटे गट) स्पष्ट बहुमत देत असताना पाच विरोधी संचालकही निवडून आले. विरोधी संचालकांमध्ये तीन पुरोगामी शिक्षक संघटना व दोन शिक्षक समितीचे संचालक होते. पहिल्या वर्षीच ‘पुरोगामी’चे अरुण पाटील हे सत्तारूढ गटासोबत गेले. त्यानंतर ‘पुरोगामी’चे प्रसाद पाटील यांनी दोन-अडीच वर्षे कारभाराविरोधात कडवा संघर्ष केला. त्यांना लक्ष्मी पाटील, सुरेश कोळी व डी. जी. पाटील यांनी साथ दिली. सर्वसाधारण सभेपुढे नोकरभरतीचा विषय आला, त्यावेळी सभासदांनी विरोध केला होता. मात्र भरती करताना विरोधी पाच संचालकांनी विरोध करण्याऐवजी आपापली कर्मचारी भरले. त्यामुळे विरोधकांचा हा प्रयत्न म्हणजे पंक्तीत बसून जेवायचे आणि बाहेर येऊन जेवलोच नाही म्हणून सांगायचे, असाच प्रकार असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे.
बँकेच्या हिताआडून सत्तारूढ व विरोधकांचे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकारण सुरू आहे.