हुपरी शहरात कोट्यवधीची विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:48+5:302021-04-04T04:23:48+5:30
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहरात शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेतून विकासकामे धडाक्यात सुरू आहेत. शहरातील विविध भागातील ३६ रस्त्यांचे ...

हुपरी शहरात कोट्यवधीची विकासकामे
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहरात शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेतून विकासकामे धडाक्यात सुरू आहेत. शहरातील विविध भागातील ३६ रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, नाले-गटारीची बांधकामे करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच शाहू तालीम इमारत नूतनीकरण अशी जवळपास ५ कोटी रुपये खर्चाची विविध प्रकारची विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या विकासकामांच्या धडाक्यामुळे रौप्यनगरी हुपरी शहराला नवा लूक प्राप्त होत असल्याचे चित्र अनुभवावयास मिळत आहे.
नगरपरिषदेला सन २०१८-१९ करिता रस्ते अनुदान ३५ लाख, तर नवीन नगरपरिषद विशेष साहाय्य अनुदान योजनेतून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच २०१९-२० करिता रस्ते अनुदान ३५ लाख, दलितेतर योजना १६ लाख, दलित वस्ती ५० लाख, नवीन नगरपरिषद विशेष साहाय्य योजना १ कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे.
मागील वर्षी कोरोनाची पार्श्वभूमी, पावसाळा आदी कारणांमुळे ही विकासकामे अपूर्ण राहिली होती. नगराध्यक्षा जयश्री गाट व प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजातून कोणताही निधी परत जाणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे शहरात सध्या विकासकामांचा मोठ्याप्रमाणात धडाका सुरू आहे. अंबिकानगर, गंगानगर, सिद्धार्थनगर आदी भागांतील रस्ते अरुंद असल्याने या भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. शहरातील विविध वसाहतीतील ३६ रस्त्यांच्या कामाबरोबरच लाईट व्यवस्था, पाणीपुरवठा आदी कामेही उत्तमरीत्या पूर्णत्वास येत आहेत. शहरात होत असलेल्या सर्व प्रकारच्या दर्जेदार विविध विकासकामांमुळे शहराला नवा लूक प्राप्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
:चौकट:
नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शहरात जास्तीत जास्त विकासकामे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. सध्या होत असलेले रस्ते आधुनिक पेव्हर मशीनने दर्जेदार होत आहेत. याबरोबरच शहरात आणखीन ३०० पथदिवे बसविण्यात येणार आहेत. या सर्व विकासकामामुळे रौप्यनगरीला नवा लूक प्राप्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील एक वर्षामध्ये शहरातील विकासकामात कोणतीही कसूर शिल्लक राहणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
--------::--------
फोटो - नगराध्यक्षा जयश्री गाट