बार उडाला, इच्छुकांचे सीमोल्लंघन
By Admin | Updated: August 2, 2015 01:21 IST2015-08-02T01:21:43+5:302015-08-02T01:21:43+5:30
वेध महापालिका निवडणुकीचे : अनेकांची उमेदवारी जाहीर, प्रचाराला सुरुवात

बार उडाला, इच्छुकांचे सीमोल्लंघन
कोल्हापूर : प्रभाग कसा होणार आणि त्यावर कोणते आरक्षण पडणार, याबाबत शहरवासीयांना लागून राहिलेली कमालीची उत्कंठा शुक्रवारी (दि. ३१) दुपारी संपुष्टात येताच महानगरपालिकेच्या आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी फटाक्यांची आतषबाजी करीत अनेक इच्छुकांनी सीमोल्लंघन केले. प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यावर अवघ्या काही तासांतच उमेदवारांनी आपले प्रभाग तसेच उमेदवारी जाहीर करून टाकली. प्रत्येक प्रभागातील चौकाचौकांत झालेली फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभागात काढल्या जाणाऱ्या फेऱ्या यांमुळे शहरातील वातावरण निवडणूकमय होऊन गेले.
गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण शहराला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले होते; परंतु संपूर्ण प्रभागांची रचना बदलली जाणार असल्याने तसेच आरक्षणे टाकली जाणार असल्याने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून फारशा हालचाली झालेल्या नव्हत्या. शुक्रवारी दुपारी प्रभाग तसेच आरक्षणे निश्चित झाल्यानंतर मात्र निवडणुकीच्या राजकारणाने वेग घेतला. बी.सी., ओबीसी प्रभागांसह सर्वसाधारण प्रभागात मोठी चुरस होणार, हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. यंदा प्रथमच पन्नास टक्के महिला निवडून येणार असल्याने महिला वर्गातही निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता आहे.
उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन सुरू
निवडणुकीच्या हालचाली शुक्रवारी दुपारनंतर गतीने सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी रातोरात आपल्या प्रभागांचा कानोसा घेऊन ते निश्चित करण्यास प्राधान्य दिले. तातडीने उमेदवारी जाहीर करण्यामागे काहींचे वेगळे आडाखे आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांवर प्रभाव टाकण्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अनेकांनी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारांनी प्रभागाच्या प्रमुख चौकात, गल्लीत, कॉलनीत फटाक्यांची आतषबाजी करून आपण निवडणूक लढवीत असल्याची घोषणा करून टाकली.
काहींची चाचपणी सुरूच
गत निवडणुकीतील पाच ते सहा प्रभागांचे अनेक तुकडे झाले आहेत. जुने प्रभाग नव्याने तयार झालेल्या चार-चार प्रभागांत विखुरले गेले आहेत. त्यामुळे त्या प्रभागातील इच्छुकांची तसेच विद्यमान नगरसेवकांची चांगलीच गोची झाली आहे. रविकिरण इंगवले, राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, मुरलीधर जाधव, महेश जाधव, सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील या मान्यवर नगरसेवकांचे प्रभाग विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांनी नजीकच्या प्रभागावर लक्ष केंद्रित करून मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. या मंडळींनी आपली उमेदवारी जाहीर केली नसली तरी निवडणूक लढण्याची तयारी मात्र त्यांनी सुरू केली आहे. अशीच अवस्था अन्य इच्छुकांचीही झाली असून, त्यांनीही मतदारसंघांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवाजी पेठेत मातब्बर लढणार
शिवाजी पेठेत यावेळी अत्यंत अटीतटीच्या लढती होणार आहेत. पद्माराजे उद्यान, चंद्रेश्वर, फिरंगाई, तटाकडील तालीम, नाथागोळे तालीम अशा पाच प्रभागांत शिवाजी पेठ विभागली गेली आहे. फिरंगाईवरील सर्वसाधारण महिला आरक्षण वगळता बाकीचे चार प्रभाग सर्वसाधारण झाले आहेत. त्या पाचही प्रभागांत कमालीची चुरस पाहायला मिळेल. पद्माराजे उद्यानमधून माजी महापौर सुनीता राऊत यांचे पती अजित राऊत, माजी महापौर बाजीराव चव्हाण (किंवा त्यांचे पुत्र), माजी उपमहापौर विक्रम जरग, शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव, महेश चौगुले आपले नशीब अजमावणार आहेत. रथी-महारथींमुळे ही निवडणूक गाजणार हे नक्की!
खराडे-बोंद्रे विरोधात ?
चंद्रेश्वर प्रभाग सर्वसाधारण राहिल्यामुळे येथेही कमालीची चुरस राहणार आहे. विद्यमान नगरसेवक परीक्षित पन्हाळकर यांनी पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे; तर त्यांच्या विरोधात नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, भानुदास इंगवले (किंवा त्यांचे पुत्र), प्रकाश सरनाईक, शशिकांत नलवडे, धनाजी दळवी असे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज खराडे यांनाही निवडणूक रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे झाले तर खराडे-बोंद्रे या पाहुण्यांतील लढत रंगण्याची शक्यता आहे.
मतदारांची छाननी सुरू
महापालिका निवडणुकीसाठी अद्याप मतदार यादी जाहीर झाली नसली तरी इच्छुकांनी आपल्या प्रभागातील मतदारांवर कटाक्ष टाकण्यास सुरुवात केली आहे. कोणत्या गल्लीत, कॉलनीत कोण राहतो, त्यांचे नातेवाईक कोण आहेत, कोण कोणाचे मित्र आहेत, याची पडताळणी सुरू केली आहे. मतदारांना भेटत असताना अशा ओळखीचा फायदा होऊ शकतो; त्यामुळे मतदार याद्यांची छाननी उमेदवारांकडून केली जात आहे. आपल्या थेट संपर्कातील मतदार, ओळखीने निघणारे मतदार यांच्या नावांच्या याद्या तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
आषाढीला प्रारंभ
महानगरपालिके ची निवडणूक लढवायची म्हटल्यावर कार्यकर्ते पाहिजेत आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांना जोडणारा एक समान धागा म्हणजे जेवणावळी होय. त्यातच आता आषाढी महिना सुरू असून मांसाहार करणाऱ्यांना ती पर्वणीच ठरते. ही संधी साधत उमेदवार आता अशा जेवणावळी सुरू करून आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करीत आहेत. प्रमुख कार्यकर्ते, प्रचार यंत्रणेतील मुख्य भूमिका बजावणारे कार्यकर्ते यांना आता भाव आला आहे.
इंगवले कुटुंबातील जावा आमने-सामने
वेगवेगळ्या कारणांनी संपूर्ण शहरभर चर्चेत असलेले रविकिरण व अजय या दोन इंगवले बंधूंना निवडणूक लढता येणार नाही; कारण त्यांचा फिरंगाई प्रभाग ‘सर्वसाधारण महिला’ असा झाला आहे; परंतु त्यांनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. रविकिरण इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले, तर अजय इंगवले यांच्या पत्नी प्रज्ञा इंगवले एकमेकींबरोबर दोन हात करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
गणेशोत्सव होणार दणक्यात
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दहीहंडी, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. प्रभागातील उमेदवार निश्चित झाल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही एक प्रकारचे आंदणच मिळाले आहे. गणेशोत्सवात उमेदवारांनी मार्केटिंग करण्याची संधी सोडायची नाही, असे ठरविलेले आहे. त्यामुळे साहजिकच मंडळांच्या कार्यकर्त्यांचे भावही वधारले जाणार आहेत.