बापू जाधव यांचे आत्मचरित्र राहिले अपूर्ण

By Admin | Updated: January 19, 2017 00:54 IST2017-01-19T00:54:17+5:302017-01-19T00:54:17+5:30

जिद्दीचा प्रवास : जीवनसंघर्ष ठरेल नव्या पिढीला प्रेरणादायी; तातडीने पूर्ण करून प्रकाशित होणे आवश्यक

Bapu Jadhav's autobiography remained incomplete | बापू जाधव यांचे आत्मचरित्र राहिले अपूर्ण

बापू जाधव यांचे आत्मचरित्र राहिले अपूर्ण

कोल्हापूर : ‘सरोज आयर्न’च्या बापू जाधव यांच्या आत्मचरित्राचे लेखन येथील माजी प्राचार्य डी. आर. कोण्णूर यांनी केले आहे; परंतु ते अजून प्रकाशित झालेले नाही. त्याचे थोडे काम अपुरे आहे; परंतु बापू आजारी पडल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. मंगळवारी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने हे आत्मचरित्र तातडीने पूर्ण व्हायला हवे. त्यातून बापूंच्या जिद्दीचा प्रवास नव्या पिढीसमोर येऊ शकेल.
कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेत बापूंचे आई-वडील राहत होते. त्यांचे वडील शंकरराव जाधव हे गवंडी काम करत होते; तर आई सोनाबाई या मोलमजुरी करून कुटुंबाला आधार देत होत्या. बापू बारा वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यावेळी बापूंचे कसेबसे चौथीपर्यंत शिक्षण झाले. आईला घरखर्चासाठी मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षण सोडले. अत्यंत हलाखीचे जिणे नशिबी आलेल्या बापंूनी कष्टाच्या बळावर आयुष्यच बदलून दाखविले. त्यांना आईबद्दल कमालीचा आदरभाव होता. ‘तिच्यामुळेच आयुष्यात उभा राहू शकलो,’ अशी भावना ते व्यक्त करत.
तो काळ साधारणत: सन १९५० चा होता. बापू त्यावेळी मे. पाटोळे-जाधव आणि कंपनीमध्ये हेल्परचे काम करत होते; परंतु त्यांच्यातील जिज्ञासूपणा पाहून त्यांना फौंड्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सिलिंडर हेडचे काम फारच किचकट आणि क्लिष्ट असल्याने कोल्हापुरात त्याची निर्मिती सहसा कोण करत नव्हते. ही संधी ओळखून बापूंनी उद्योग उभारणी करण्याचे ठरविले. भैयासाहेब हुदली यांनी त्यांना संधी दिली. बापूंनी संधीचे सोने करून रिजेक्शनविना सिलिंडर हेड बनवून दाखविले. बापूंना त्यांनी शाब्बासकी म्हणून पाचशे रुपये बक्षीस दिले व स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला तेथून बापचे पाऊल पडले. त्यांनी मागे पाहिलेच नाही.
फौंड्री उद्योगाकडे पर्यावरणाला हानीकारक उद्योग म्हणून पाहिले जाते; परंतु बापूंनी सन २००७ मध्ये ‘भारतातील पहिला सँड रिक्लेमेशन प्लँट’ कॅनडा येथून आयात करून स्वत:च्या सरोज आयर्नमध्ये बसविला. त्यामुळे या कंपनीच्या सर्व फौंड्रीज या ‘ग्रीन फौंड्रीज’ म्हणून ओळखल्या जातात.


पाच नाजूक बोटे...
बापूंनी सन १९७३ मध्ये बाबा कदम यांच्या कादंबरीवर आधारित ‘पाच नाजूक बोटे’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता; परंतु त्यात अपयश आल्यावर त्यांनी वेळेतच हे क्षेत्र सोडले.
४त्यांना नाटक व चित्रपटांचे वेड होते. त्यामुळे सोमवारी सुटीदिवशी ते सलग तीन चित्रपट पाहत असत. त्यांना पियानो वाजविण्यातही आनंद वाटत होता.


प्रामाणिक करदाता
बापंूच्या आयुष्यभराच्या जडणघडणीचा कष्ट आणि प्रामाणिकपणा हा पाया होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या व्यवहारातही कायम पडले.
कामगारांशी ते स्वत:च्या मुलांप्रमाणे वागत. त्यांच्या सुख-दु:खांत सहभागी होत. उद्योजक म्हणून सर्व प्रकारचे कर प्रामाणिकपणे ते भरत असत.
आयकर विभागातर्फे त्यांचा त्याबद्दल एकदा सत्कारही झाला होता. असे करणे म्हणजेच खरी देशसेवा असते, असे ते मानत असत.

Web Title: Bapu Jadhav's autobiography remained incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.