बेडगमध्ये रंगला बालसाहित्यिकांचा मेळा!
By Admin | Updated: January 10, 2015 00:19 IST2015-01-10T00:06:04+5:302015-01-10T00:19:53+5:30
विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती : ग्रंथदिंडी, कथाकथन, मुलाखतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेडगमध्ये रंगला बालसाहित्यिकांचा मेळा!
प्रवीण जगताप - लिंगनूर समाज उभारणीचे सर्जनात्मक कार्य लेखणीतून घडते. परिसरातील घटनांकडे संवेदनशीलतेने पाहिल्यास कविता जन्माला येते. गरिबी, दुष्काळ, अंधश्रद्धा या समस्यांचे व समाजमनाचे प्रतिबिंब साहित्यात का उमटू शकत नाही, या भावनेने प्रेरित होऊन त्याचे उत्तर शोधताना सामान्य माणूस लेखणीतून साहित्यात आला, असे प्रतिपादन सुरसगाव (जि. जळगाव) येथील ज्येष्ठ कवी अशोक कौतिक कोळी यांनी केले.
बेडग (ता. मिरज) येथे आयोजित मिरज तालुक्याच्या दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात बालमुलाखतकार शिवानी चौगुले (सोनी), सीमरन जमादार (मौजे डिग्रज), सिराज मुजावर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी कोळी यांनी भावविश्व उलगडले.
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याने झाली. लेझीम, टाळ, टिपऱ्या, वारकरी वेशभूषा, दिंडी नृत्य, सांस्कृतिक वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा, झांज, फुगडी व विविध सांस्कृतिक नृत्य व खेळांचे
प्रकार ग्रंथदिंडीची शोभा वाढवित
होते.
गावात मुख्य पेठेतील रस्त्याच्या बाजूने रांगोळ्या काढल्या होत्या. ग्रंथदिंडी साहित्यनगरीत येताच सभामंडपात बालरसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यानंतर सभापती दिलीप बुरसे, शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, कवी अशोक कोळी, संमेलनाध्यक्षा गायत्री पाटील, अॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष वेदांत शहा याने स्वागत केले.
संमेलनाध्यक्षा गायत्री पाटील म्हणाली की, या साहित्य संमेलनातून लेखनकलेस प्रोत्साहन व दिशा मिळाली व कथा-कवितांच्या छंदाचे वास्तवात रूपांतर झाले.
सकाळच्या सत्रात कवी कोळी यांची विविधांगी प्रश्नांसह प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी कोळी यांनी ‘चिमण्यांनो धीर धरा’ ही कविताही सादर केली. त्यानंतर कथाकथन सत्राचा अध्यक्ष हर्षवर्धन कांबळे याच्या उपस्थितीत कथाकथन पार पडले.
दुपारच्या सत्रात काव्यसंमेलनाध्यक्ष सुमित माळी याच्या अध्यक्षतेखाली बालकवींनी काव्यरचना सादर केल्या. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव, भक्ती कदम, प्रतीक बिसुरे, निकिता चव्हाण यांनी केले.
उपसभापती तृप्ती पाटील, सरपंच सुमनताई खरात, ििकरण गायकवाड, हरिभाऊ गावडे, पृथ्वीराज पाटील, अमर पाटील, साहित्यिक फारूक काझी, दयासागर बन्ने, संमेलनाचे प्रवर्तक गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, पं. स. सदस्या राणी देवकारे, जयश्री कबुरे उपस्थित होते. संमेलनप्रमुख विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, उल्हास सानप, विजय नागरगोजे, महादेव वनवे, रवींद्र केंचे, बाळासाहेब लिंबीकाई, विष्णू ओमासे यांनी संयोजन केले.
कोणती कविता लाडकी ?
कवी अशोक कोळी यांच्या मुलाखतीत, तुम्हाला सर्वात आवडती कविता कोणती? असा प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले, जसे आई-वडिलांना आपली सारीच मुले प्रिय असतात, तसे लेखणीतून उतरलेल्या साऱ्याच कविता कवीला प्रिय असतात..
काव्यसंमेलनात एका बालकवीच्या ‘थंडी रे थंडी, डोक्यावर उभी राहिली केसाची शेंडी, थंडी रे थंडी, कोंबडीच्या पिलाने दिली झटक्यात बारा अंडी’ या विनोदी रचनेने रसिकांची दाद मिळविली.
ग्रंथदिंडीत केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका यांनी दिंडीनृत्य, फुगडी खेळून, नाचून सहभाग घेतला, तर पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे व सदस्य शंकर पाटील यांनी झांज खेळून ग्रंथदिंडीत सहभाग नोंदविला. लेझीम नृत्याने, विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकुसरींनी, तसेच विविध वेशभूषेतील बालकलाकारांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली.