महापौर निवडीच्या तारखेकडे लक्ष
By Admin | Updated: May 13, 2016 00:58 IST2016-05-13T00:31:20+5:302016-05-13T00:58:22+5:30
तारीख अद्याप अनिश्चितच : भाजपला सत्तेचे गणित जमणे अशक्य

महापौर निवडीच्या तारखेकडे लक्ष
कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहातील अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे अनपेक्षितपणे रिक्त झालेल्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी तारीख निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही निवडणूक कधी होणार, याची प्रतीक्षा केवळ महानगरपालिका वर्तुळातच नाही, तर सर्वसामान्य जनतेलाही लागून राहिली आहे. दरम्यान, बदललेल्या परिस्थितीतही महापौरपद आपल्याकडे खेचण्याइतके बहुमत नसल्याची जाणीव भाजप-ताराराणी आघाडीला झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका सभागृहातील अश्विनी रामाणे, संदीप नेजदार, वृषाली कदम, दीपा मगदूम, सचिन पाटील, संतोष गायकवाड, नीलेश देसाई अशा सात नगरसेवकांचे जातीचे दाखले विभागीय जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे त्यांना अवघ्या सहा महिन्यांतच घरी बसावे लागले, तर महापौर व महिला बालकल्याण समिती सभापतीसारख्या महत्त्वाच्या पदावरून पायउतार व्हावे लागल्याने काँग्रेस पक्षावर नामुष्की ओढावली.
एखाद्या महापौरांना जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे घरी जावे लागण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. क ॉँग्रेस व अश्विनी रामाणे यांच्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या महापौरपदाची अवहेलना झाली.
सध्या महापौरपद रिक्त आहे. नवीन महापौरांची निवडणूक घेण्यात यावी, त्यासाठी तारीख तसेच पीठासन अधिकारी निश्चित करण्यात यावेत, म्हणून महानगरपालिका नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयास विनंती करणारे पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. गुरुवारी सायंकाळपर्यंत काही तरी निरोप येईल अशी महानगरपालिकेच्या प्रशासनास प्रतीक्षा होती; परंतु सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तरी काहीच कळविण्यात आले नाही. महापौर निवडीची तारीख कधी निश्चित होणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
कॉँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादी, भाजप व ताराराणी आघाडीच्या प्रत्येकी एका नगरसेवकास आपले पद गमवावे लागले आहे, त्यामुळे सभागृहातील बलाबल सत्तारूढ ३९, तर भाजप-ताराराणी आघाडी ३१ असे झाले आहे. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी या दोन्ही पक्षांपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या घडीला कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे कॉँग्रेसचाच महापौर होईल, यात शंका नाही.
भाजप-ताराराणी आघाडीत तशी सामसूमच आहे. काँग्रेसकडे स्वाती यवलुजे, उमा बनछोडे व जयश्री चव्हाण या ओबीसी प्रवर्गातील नगरसेविका आहेत. या तिघींपैकी एकीचा महापौरपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून विचार केला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)
न्यायालयाच्या निर्णयानंतरच निवडणूक
महापौर निवडणूक होणार की नाही, हे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील. सात अपात्र नगरसेवकांनी आपल्यावरील कारवाईला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकांच्या सुनावणीवेळी काय निर्णय होतो, हे महत्त्वाचे आहे.
जर कारवाईला स्थगिती मिळाली तर महापौर निवडीचा कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे, म्हणूनच न्यायालयाच्या निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.
आमदार सतेज पाटील आता अधिक दक्ष
एकदा नामुष्की ओढावल्यामुळे कॉँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील अधिक दक्ष झाले आहेत.
महापौरपदी सतेज पाटील कोणाची निवड करतात, हा आता उत्सुकतेचा विषय आहे.