सुवर्णकन्या राहीच्या कामगिरीकडे देशवासीयांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST2021-07-30T04:24:58+5:302021-07-30T04:24:58+5:30
कोल्हापूर : टोकीओ येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्या कामगिरीकडे देशवासीयांचे ...

सुवर्णकन्या राहीच्या कामगिरीकडे देशवासीयांचे लक्ष
कोल्हापूर : टोकीओ येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्या कामगिरीकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या फेरीत गुरुवारी सकाळी तिने ३०० पैकी २८७ गुण मिळवत अंतिम सोळामध्ये स्थान पक्के केली. तिच्यासह भारताची दुसरी नेमबाज मनू भाकरही तिच्यासोबत या प्रकारात आपले आव्हान टिकवून आहे.
कोल्हापूरच्या राहीने यापूर्वी ऑलिम्पिक कोटा मिळवताना अनेक विक्रमांची बरोबरी केली आहे. तिने क्रोेएशिया येथे झालेल्या जागतिक विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी केली. त्यामुळे तिचा कामगिरीचा आलेख सध्या चढाच आहे. गुरुवारी सकाळी ५.३० वाजता झालेल्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात तिने ३०० पैकी २८७ गुण मिळवत ४१ स्पर्धकांपैकी १६ वे स्थान पटकाविले. आज, शुक्रवारी सकाळी दुसऱ्या फेरीतील सामने होणार आहेत. या फेरीत तिची कामगिरी उंचावल्यास ती स्पर्धेतील आव्हान टिकून राहील. तिच्यासोबत भारताची दुसरी नेमबाजी मनू भाकर ही सुद्धा आहे. तिचीही कामगिरी लक्षणीय आहे. तिने या सामन्यात ३०० पैकी २९२ गुण मिळवत पहिल्या फेरीत पाचवे स्थान पटकाविले. या दोघांच्या कामगिरीवर या प्रकारातील नेमबाजीमधील पदक अवलंबून आहे. यासोबतच राही सोबत कोल्हापूरची दुसरी सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हीही ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहे. ती आज या प्रकारात पहिल्या फेरीतील सामने खेळणार आहे. त्यामुळे आजच्या नेमबाजी स्पर्धेतील राही आणि तेजस्विनी यांच्या कामगिरीकडे कोल्हापूरसह देशवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.