आजरा नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST2021-02-26T04:36:00+5:302021-02-26T04:36:00+5:30
आजरा नगरपंचायतीच्या सन २०२१-२२ च्या १३ कोटी २१ लाख ३२ हजार ८७० रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरसेवकांनी काही बदल सूचवून ...

आजरा नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
आजरा नगरपंचायतीच्या सन २०२१-२२ च्या १३ कोटी २१ लाख ३२ हजार ८७० रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरसेवकांनी काही बदल सूचवून मंजुरी दिली. अंदाजपत्रकात १८ लाखांच्या विशेष तरतुदी, १ लाख २५ हजारांच्या विशेष तरतुदी तर वेतन राखीव निधीवर ७ लाखांची तरतूद करण्यात आली. विशेष सभेत दुकान गाळ्यांची भाडेवाढ, वसुली यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरपंचायतीचा १३ लाख ६५ हजार ८७० रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी मांडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.
मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी घटकनिहाय अंदाजपत्रक सादर केले. दुकान गाळ्यांचे भाडे किती जमा व किती खर्च झाले. मुदत संपलेल्या दुकान गाळ्यांची भाडेवाढ का केली नही, असा सवाल विरोधी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केला. मुदत संपलेल्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात आजच नोटीस काढा असे नगरसेवक किशोर पारपोलकर व अनिरुद्ध केसरकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने ३० वर्षांपूर्वी दुकान गाळे बांधले. सुरुवातीचे १० वर्षे दुकान गाळ्यांसाठी पैसे दिले व त्यानंतर १० वर्षे व्यवहार म्हणून आहे त्यांनाच गाळे दिले; पण सध्या गाळे मालकांनी पोटभाडेकरू ठेवून जादा दराने भाड्याने दिले आहेत. भाडेवाढ झालीच पाहिजे, असे अशोक चराटी यांनी सांगितले. गाळ्यांसंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी सांगितले.
अंदाजपत्रकात सुचविलेल्या विषयांमध्ये नगरसेवकांना प्रशिक्षण अभ्यास दौरा, श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व भौतिक सुविधेसाठी निधीची उपलब्धता, नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, दुकान गाळेधारकांकडे असलेले थकीत भाडे वसुलीसंदर्भात नगरसेवकांनी सूचना केल्या. सामान्य लोकांचे घरफाळा थकीत राहिलेस डिजिटल फलकांवर नावे मग दुकान गाळेधारक थकीत राहिल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार ? असा सवालही करण्यात आला. अंदाजपत्रकाच्या सभेतून प्रमुख नगरसेवक अन्य ठिकाणच्या बैठकीसाठी निघून गेल्याने नगरसेविका शुभदा जोशी व शकुंतला सलामवाडेही निघून गेल्या. सभेत किरण कांबळे, संभाजी पाटील यांनीही अंदाजपत्रकात बदल सुचविले.