कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी

By Admin | Updated: February 26, 2016 00:25 IST2016-02-26T00:25:49+5:302016-02-26T00:25:49+5:30

कोल्हापूर-पुणे, लोंढा -मिरज मार्गांचे विद्युतीकरण

Approval of Kolhapur-Vaibhavwadi railway line | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी

सदानंद औंधे 

मिरज
रेल्वे अर्थसंकल्पात लोंढा-मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी आर्थिक तरतुदीसह कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर-वैभववाडी या १०७ किलोमीटर नवीन रेल्वेमार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडला जाणार आहे. मात्र, दुष्काळी भागातून जाणाऱ्या कवठेमहांकाळ - विजापूर या नवीन रेल्वेमार्गासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी रेल्वे अंदाजपत्रकात प्रवासी सुविधांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याने रेल्वे अंदाजपत्रक पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी निराशाजनक ठरले आहे.
यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात कोल्हापूर- मिरज- पुणे या ३२६ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ३२६ कोटी रुपये व मिरज-लोंढा या १८९ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या विद्युती-करणासाठी २०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या चार हजार कोटी खर्चाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणास मान्यता देण्यात आली आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मिरज-कवठेमहांकाळ - जत-विजापूर व कऱ्हाड - कडेगाव - लेंगरे - खरसुंडी -आटपाडी - दिघंची - महूद - पंढरपूर या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले; मात्र त्याचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे अंदाजपत्रकात मान्यता मिळालेली नाही. कऱ्हाड-चिपळूण या नवीन मार्गाला गत अंदाजपत्रकात मान्यता देण्यात आली आहे. या मार्गासाठी दहा कोटीची तरतूद केली आहे. कोल्हापूर-वैभववाडी व कराड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. नवीन रेल्वेमार्ग वगळता कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागण्यांची रेल्वे अंदाजपत्रकात दखल घेण्यात आलेली नाही. १९२७ नंतर मिरजेपासून एकाही नवीन मार्गाची उभारणी झालेली नाही. मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याने या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण तातडीने पूर्ण झाल्यास मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे.
कोल्हापूर व मिरज मॉडेल रेल्वेस्थानक बनविण्याची व मिरजेत रेल्वे हॉस्पिटल व मॉल उभारण्याची रेल्वे अर्थसंकल्पातील घोषणा झाली, मात्र त्याची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. यावर्षी अर्थसंकल्पात एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना सर्वसाधारण डबा वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मोठी गर्दी असलेल्या पॅसेंजरचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे. देशातील चारशे रेल्वे स्थानकात वायफायची सुविधा देण्यात येणार आहे. त्यात मिरज व कोल्हापूरचा समावेश केला आहे. मिरज, सांगली व कोल्हापूर रेल्वेस्थानकात कोच इंडिकेटर, सीसीटीव्ही, तिकीट खिडक्यांची संख्या वाढविणे या प्रवासी सुविधांसाठी निधीची तरतूद आवश्यक आहे. छोट्या स्थानकांत एक्सप्रेस थांबवाव्यात. वाहतुकीला अडथळा होणाऱ्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांची व्यवस्था व्हावी या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांनाही अर्थसंकल्पात तोंडाला पाने पुसण्यात आल्याची सांगली-कोल्हापूरातील प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.
२७ बोगदे, २५ मोठे पूल
या नवीन मार्गावर १० रेल्वे स्थानके, २७ ठिकाणी बोगदे उभारले जाणार आहेत. त्यातील सर्वांत मोठा रेल्वे बोगदा हा ३.९६ किलोमीटर लांबीचा असेल. २५ मोठे पूल, नदी, नाल्यांवरील ७४ छोेटे पूल, ६८ रोड अंडर ब्रीज, ५५ रोड ओव्हर ब्रीज यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यासाठी १३७५ कोटींची तरतूद
कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गाला मान्यता मिळाल्याने गेल्या २५ वर्षांपासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. सुमारे १०७ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी एकूण ३०५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; त्यापैकी १३७५ कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याची घोषणा गुरुवारी
प्रभू यांनी अर्थसंकल्पात केली. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची मागणी मंजूर करून त्यासाठी ६१ कोटी ५० लाखांची
तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. अर्थसंकल्पात कोल्हापूरबाबतच्या महत्त्वाच्या दोन मागण्या पूर्ण
झाल्याने याबाबत नागरिक, उद्योजक, व्यापारी, आदी घटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
असा असेल
नवा मार्ग
हा प्रस्तावित रेल्वेमार्ग
हा वैभववाडी-उपळे-सैतवडे-भूतलवाडी-कळे-भुये-कसबा बावडा-रेल्वे गुड्स मार्केट यार्ड (कोल्हापूर) असा आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरात जंक्शन उभारण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. त्यानुसार या मार्गाच्या सर्वेक्षणाला दि. ५ मे २०१५ रोजी वैभववाडीतून सुरुवात झाली. मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. दोन पथकांद्वारे हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.

Web Title: Approval of Kolhapur-Vaibhavwadi railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.