जिल्ह्यात खरीप पेरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:02+5:302021-05-24T04:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेली दोन दिवस झाले भाताच्या धूळवाफ पेरणीची काहीसी लगबग सुरू झाली आहे. यंदा ...

जिल्ह्यात खरीप पेरणीची लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेली दोन दिवस झाले भाताच्या धूळवाफ पेरणीची काहीसी लगबग सुरू झाली आहे. यंदा मान्सून वेळेत हजर होणार असल्याने मशागत करून वेळेत पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
कोल्हापूर जिल्हा साधारणत: १५ मे पासून भाताच्या धूळवाफ पेरणीला सुरुवात होते. उन्हाळी पिके, भाजीपाला काढून त्या ठिकाणी भाताची पेरणी केली जाते. मात्र, यंदा १५ मे पासून तौक्ते चक्रीवादळाने तीन दिवस पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर इतका प्रचंड होता, की शिवारात पाणीच पाणी झाले. त्यामुळे उन्हाळी पिके काढणीबरोबरच खरीप मशागतीची कामे काहीसी खोळंबली होती. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप मशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे धूळवाफ पेरणीही सुरू झाल्या आहेत.
शिवारे फुलली
उन्हाळी पिके काढणीबरोबरच मशागतीसाठी शिवारे माणसांनी फुलली आहेत. बांध घालणे, चोतकट वेचणे, शेण खत विस्कटणे, आदी कामे सुरू झाली आहेत.
फोटो ओळी : जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सांगरूळ परिसरात भाताची चौफणीने पेरणी करण्यात शेतकरी मग्न आहेत. (फोटो-२३०५२०२१-कोल-खरीप)