आजरा-गवसे मार्ग मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: December 9, 2014 00:57 IST2014-12-08T21:05:40+5:302014-12-09T00:57:01+5:30
कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने,

आजरा-गवसे मार्ग मृत्यूचा सापळा
ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -आजरा ते गवसे साखर कारखान्यापर्यंतचा मार्ग धोकादायक वळणांमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणांची कल्पना देणारे मार्गदर्शक फलक लावण्याबरोबरच वळणावरील मोऱ्यांची डागडुजी करून संरक्षक कठडे बांधणे आवश्यक आहे.आजऱ्याकडून आंबोलीमार्गे गोव्याला जाणारा हा राज्यमार्ग आहे. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी भागातून पर्यटनाकरिता गोव्याकडे जाणारा पर्यटक या मार्गास प्राधान्य देताना दिसतो. त्यामुळे दिवस-रात्र या मार्गावर चारचाकींसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने, समोर असणाऱ्या झाडांमधून वाहने न दिसल्याने, तर काहीवेळा मोऱ्यांना संरक्षक कठडे नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होतात. गेल्या वर्षभरामध्ये या पाच ते सात किलोमीटरच्या पट्ट्यात एकूण ११ अपघात झाले असून, यामध्ये सातजणांना मृत्यूला, तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.
काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅक्टरसारखे वाहन बंद पडल्यास तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. धोकादायक वळणे काढावीत, अशी मागणी होत आहे.
साहेब...गोव्याला जाणारा रस्ता कुठला हो ?
आजऱ्यातील संभाजी चौकात असणारे दिशादर्शक फलक निदर्शनास येत नसल्याने कोल्हापूरकडून येणारे पर्यटक ‘साहेब... गोव्याला जाणारा रस्ता कुठला ?’, तर कोकणातून येणारे पर्यटक असाच प्रश्न कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याबाबत करतात.
संरक्षक कठडा... आणि अपघात
दोन महिन्यांपूर्वी याच मार्गावर मारुती स्विफ्ट गाडीला मोरीवर संरक्षक कठडा नसल्याने अपघात होऊन ती ओढ्यात कोसळली होती. यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता.