कोल्हापूरची ‘हवा’ बिघडली

By Admin | Updated: March 23, 2016 00:17 IST2016-03-23T00:15:42+5:302016-03-23T00:17:06+5:30

जागतिक हवामान दिन : नायट्रोजन आॅक्साइड, धुलिकणांनी ओलांडली मर्यादा; विद्यापीठाच्या ‘पर्यावरणशास्त्र'कडून तपासणी

'Air' in Kolhapur spoiled | कोल्हापूरची ‘हवा’ बिघडली

कोल्हापूरची ‘हवा’ बिघडली

कोल्हापूर : नायट्रोजन आॅक्साइड, नाकावाटे जाणारे व संपूर्ण धुलिकण या वायू प्रदूषकांचे प्रमाण कोल्हापूर शहरातील वातावरणात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात वाढ झाली असून, त्याचा येथील जनजीवनावर विपरीत परिणाम होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात शहरातील विविध परिसरांत केलेल्या तपासणीतून हे स्पष्ट झाले असल्याचे विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.
जागतिक हवामान दिनानिमित्त डॉ. राऊत यांनी हवामान बदलातील कोल्हापूरची अवस्था याबाबत ‘लोकमत’शी संवाद साधला. डॉ. राऊत म्हणाले, लोकसंख्येसह वाहनांची वाढलेली संख्या, प्रदूषके सोडणारे कारखाने व उद्योगांमुळे कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषित होत आहे. शहराची हवा किती प्रदूषित झाली आहे, ते तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाला हवेची तपासणी व सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प गेल्या वर्षी दिला. त्यानुसार शिवाजी विद्यापीठ, दाभोलकर कॉर्नर, महाद्वार रोड या परिसरातील एक दिवस आड याप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत हवेचे सर्व्हेक्षण स्पेराईटरी डस्ट सॅम्पलर (आरडीएस) यंत्राद्वारे केले. यात विद्यापीठासह अन्य ठिकाणच्या परिसरातील वायू प्रदूषकांचे प्रमाण वाढलेले दिसले. यात नायट्रोजन आॅक्साइड, नाकावाटे जाणारे धुलिकण, संपूर्ण धुलिकणांनी मानकांप्रमाणेची असलेली मर्यादा ओलांडली आहे. यात मानकांपेक्षा तिपटीने वाढ झाली आहे. शिवाय प्राणवायू व कार्बनच्या प्रमाणातील व्यस्तपणा वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये दमा, अस्थमा यांसारखे विकार वाढत आहेत. हे रोखण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, ऊर्जास्रोतांचा कमीत कमी वापर, वृक्षारोपण व संवर्धनावर भर देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

वातावरणात अनियमितता
कोल्हापूरचे हवामान विशिष्ट प्रकारचे आहे. समुद्रावरील वारे हे या प्रदेशात येते. त्यामुळे वाऱ्याची हालचाल पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. शिवाय वृक्षसंपन्न असलेल्या पश्चिम घाटावरून हवा येत असल्याने ती शुद्ध होती.
मात्र, सध्या पश्चिम घाट परिसरातील जंगलतोड, शहराचे आधुनिकीकरण, सिमेंटचे रस्ते व इमारती अशा अनैसर्गिक गोष्टींमुळे हवेतील प्रदूषण वाढत असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
ते म्हणाले, प्रदूषणामुळे वातावरणातील अनियमितता अनुभवायला मिळत असून, रोगराईचे प्रमाणही वाढत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षातील हवा प्रदूषणाची पातळी
परिसरसल्फरडाय नायट्रोजन नाकावाटे संपूर्ण धुलिकण
आॅक्साइडआॅक्साइडजाणारे धुलिकण(मिलिग्रॅममध्ये)
शिवाजी विद्यापीठ१३.८७२३. १२६२.९९१५९.०२
दाभोलकर कॉर्नर२६.७४५१. ७६१२२.२७४८०.४९
महाद्वार रोड२१.९४३९. ७५१०७.५८३८२.४६
(वार्षिक मानके, मर्यादा)५०४०६०१४०

Web Title: 'Air' in Kolhapur spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.