‘एव्हीएच’च्या विरोधात आंदोलन तीव्र
By Admin | Updated: June 10, 2014 02:16 IST2014-06-10T01:59:06+5:302014-06-10T02:16:40+5:30
‘हेमरस’ व ‘नलवडे’ शुगर्स व्यवस्थापनाचा निषेध : दोन्ही कारखान्यांच्या दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांना घेराओ

‘एव्हीएच’च्या विरोधात आंदोलन तीव्र
चंदगड : ‘एव्हीएच’ हटावसाठी चंदगड तालुक्यात आज, सोमवारी पाटणे फाटा येथे दिशा शक्ती नारी मुक्ती संघटना व चंदगड येथे याच विषयासाठी कृती समितीचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एव्हीएच हटाव व ३८० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एकदिवसाचे आंदोलन करण्यात आले. एकाच दिवशी, एकाच विषयावर तीन ठिकाणी आंदोलन केल्याने चंदगड तालुक्यात आजचा दिवस आंदोलनाचा ठरला.
तालुक्यातील नलवडे व हेमरस या कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यांतील ३८० रुपये देय आहेत. यासाठी व हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये होत असलेला एव्हीएच प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांनी चंदगड तालुक्यातील नलवडे व हेमरस हे कारखाने भांडलवदारांचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वचक ठेवायची असेल, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच तीव्र लढा देण्याची गरज आहे. ३८० रुपये हे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत ते मिळविण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळवून देऊ.
‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी तालुक्यात एव्हीएच प्रकल्प कै . बाबासाहेब कुपेकर यांनीच आणला आणि त्यांचेच वंशज एव्हीएच विरोधी आंदोलनात आहेत. त्यामुळे एव्हीएच विरोधात आंदोलन करण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर एव्हीएच हटावसाठी आमचा स्वतंत्र लढा आमच्या पद्धतीने लढू, असे सांगून एव्हीएच विरोधातील पहिली जनहित याचिका स्वाभिमानीतर्फे दाखल केल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष एस. एम. कोले, प्रा. दीपक पाटील, बाळाराम फडके, कृष्णराव रेगडे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, ३८० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठीच्या पाटणे फाटा येथे आंदोलन करण्यासंदर्भात नलवडे व हेमरस कारखान्यांना नोटिसा देऊनही त्यांचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही कारखान्यांच्या दुय्यम दर्जाच्या उपस्थित शिवप्रसाद देसाई (हेमरस) व शशिकांत थोरवत (नलवडे) या दोघा कर्मचाऱ्यांना घेराओ घालून दोरीने बांधून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस निरीक्षक लक्ष्मण सुरवसे यांनी हस्तक्षेप करून दोन्ही कारखान्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना सोमवारी (दि. १६) पाटणे फाटा येथे दुपारी एक वाजता होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्या दोन कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.
नोटिसा देऊनही दोन्ही कारखान्यांचे जबाबदार अधिकारी न पाठविल्याने हा आंदोलनाचा अवमान आहे.त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डॉ. जी. एस. पाटील, सतीश सबनीस, सुरेश कुट्रे, राजू व्हटकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)