वाघजाई डोंगरावर एजंट, धनदांडग्यांचा डोळा
By Admin | Updated: November 18, 2014 23:36 IST2014-11-18T21:15:02+5:302014-11-18T23:36:36+5:30
३५० हेक्टर जमीन होणार गायब : स्थानिक एजंटांसह महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश

वाघजाई डोंगरावर एजंट, धनदांडग्यांचा डोळा
कोतोली : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरावरील ३५० हेक्टर जमीन सध्या वेगळ्याच चर्चेमध्ये अडकली असून, तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शाहू महाराजांनी जनतेला कसून खाण्यासाठी दिलेली जमीन आज गावपातळीवर तसेच जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या एजंटांनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव चालविला आहे. तर या एजंटांच्या गळाला शासकीय कर्मचारी असल्याची चर्चा आहे.
पन्हाळा व करवीर अशा दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत वाघजाई डोंगरावर ३५० हेक्टर जमीन असून, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या ८ जून १९७३ चा आदेश क्र. आर बी / एलएनएडी / डब्ल्यू आय १३७३/७३ नुसार यातील काही जमीन ५१० शेतकऱ्यांना व काही जमीन माजी सैनिक, राधानगरी, सातार्डे, म्हाळुंगे येथील धरणग्रस्त अशा शेतकऱ्यांना विभागून सत्ता प्रकरणे (१)च्या आधारे कसून खाण्यासाठी दिली होती. त्यापैकी ५१० शेतकऱ्यांपैकी ३०० शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कब्जेपट्टी करून व रितसर ताबा घेतला असून, ७/१२ पत्रकी नोंदी घातल्या आहेत.
उर्वरीत २१० शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कब्जेपटी करून घेतलेली नाही. सदर जमिनीवर महाराष्ट्र शासन नमूद असल्याचे समजते, अशी परिस्थिती असतानाही सदरच्या जमिनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एजंटांनी आपला खेळ सुरू केला आहे, तर सदरच्या जमीन मालकांना सांगून ही जमीन शासन परत घेणार आहे. त्यापेक्षा पैसे मिळवून घ्या, असा राग एजंट शेतकऱ्यांच्या जवळ गात बसले आहेत. एजंटाकडून कमी दराने जमिनी धनदांडग्यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)
परत ताबा घेणार का?
धनदांडग्या लोकांवर शासन जमीन खरेदीचा शिक्कामोर्तब होणार का? किंवा ज्यांना जमिनी कसून खायला दिल्या, अशा लोकांनी जमिनी विकल्यास त्या जमिनी शासनाच्या नियमाचा भंग केला म्हणून परत ताबा घेणार का? असे प्रश्न परिसरात चर्चेचा विषय झाले आहेत.