पुन्हा जातीनेच घेतला सूरजचा बळी

By Admin | Updated: January 9, 2015 00:46 IST2015-01-09T00:42:51+5:302015-01-09T00:46:29+5:30

विचारपूस नाही : शासकीय यंत्रणाही ढिम्मच

Again, the victim of Suraj took birth | पुन्हा जातीनेच घेतला सूरजचा बळी

पुन्हा जातीनेच घेतला सूरजचा बळी

सचिन भोसले -कोल्हापूर - असंवेदनशील यंत्रणा आणि संस्थाचालकांचा नसलेला वचक यांमुळे एका उमलणाऱ्या भविष्याचा गुरुवारी अंत झाला. पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या सूरज पोवारने शाळा अधीक्षक व शिक्षकांनी वारंवार केलेल्या मानहानीमुळे शांतीनगर, उचगाव येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
सूरजची मृत्यूशी झुंज सुरू असताना एकाही शासकीय अधिकाऱ्याने त्याची साधी चौकशीही केली नाही. भटक्या जाती जमातींतील मुले शिकून शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी सुरु झालेल्या शाळेत परत या मुलाचा जातीनेच बळी घेतला असे वास्तव या घटनेतून पुढे आले आहे.
रंजल्या-गांजलेल्या समाजातील मुले शिकून शहाणी व्हावीत
म्हणून कोल्हापुरात संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी विविध जातिधर्मांच्या मुलांसाठी इंग्लंडच्या धर्तीवर कोल्हापुरातही वसतिगृहे काढली. यामुळे अनेक मुले त्या
काळी शिकली आणि आजही शिकत आहेत. अशा करवीरनगरीतच्या पाचगाव येथील राजर्षींच्याच नावे असलेल्या आश्रमशाळेतील सतरा वर्षांच्या सूरज पोवार याने आत्महत्या केली. हा दुदैवी प्रकार म्हणजे एका उमलत्या भविष्याचा जणू संवेदना नसणाऱ्या यंत्रणेमुळे हकनाक जीव गेला.
आठ वर्षांपूर्वी सूरजचे वडील शामराव पोवार यांचे व्यसनामुळे निधन झाले. काही वर्षे आईने सूरजसह दोन मोठ्या भावांचा सांभाळ केला. पुढे आईचेही निधन झाले. त्यामुळे सूरज लहान असल्याने कधी मोठ्या भावांबरोबर, तर कधी काका अप्पाजी काळे आणि मामांकडे राहत होता. सातवीपर्यंत तो रजपूतवाडी
येथील व्यंकाप्पा भोसले यांच्या आश्रमशाळेत शिकला. पुढे त्याने पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत प्रवेश घेतला.
३० डिसेंबरला त्याच्यावर शाळेतील अधीक्षक आणि शिक्षकांनी चोरीचा आळ घेतल्याची तक्रार
आहे. तू फासेपारध्याचा असल्याने चोऱ्याच करणार असे रागाने शिक्षक म्हटल्याने तो तडक मामाकडे निघून गेला व मामाच्या घरी रॉकेल
ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.


मुलाचा जीव गेला त्याचे काय...?
नऊ दिवस सूरज राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्याकडे नातेवाइकांशिवाय कोणीच फिरकले नाही. त्याची विचारपूस करायला ना शाळेचे कर्मचारी आले, ना समाजकल्याण विभागाचा कोणी अधिकारी. आश्रमशाळा तशा समाज व शासनाच्याही लेखी दुर्लक्षितच. तसेच दुर्लक्ष या घटनेकडेही झाले व शिकून आयुष्याचे भले झाले असते असे एक आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमजले. आता चौकशा होतील, पाहणी केली जाईल परंतु मुलाचा जीव गेला त्याचे काय...?

Web Title: Again, the victim of Suraj took birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.