टोमॅटोला लाख रुपये खर्चल्यानंतर हातात पडले ४० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:18+5:302021-09-12T04:28:18+5:30
कोल्हापूर : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट नफा मिळवून देण्याच्या एका बाजूला सरकारी गप्पा सुरू असताना दुसरीकडे मात्र घातलेल्या खर्चाच्या ...

टोमॅटोला लाख रुपये खर्चल्यानंतर हातात पडले ४० हजार
कोल्हापूर : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट नफा मिळवून देण्याच्या एका बाजूला सरकारी गप्पा सुरू असताना दुसरीकडे मात्र घातलेल्या खर्चाच्या निम्मी रक्कमदेखील हातात पडली नसल्याचे विदारक वास्तव टोमॅटो उत्पादकांच्या वाट्याला आले आहे. किलोचा ४ ते ५ रुपयांचा दर पाहून वाहतूक आणि तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो काढणीच बंद केली आहे.
रेेंदाळ (ता. हातकणंगले) येथील टोमॅटो उत्पादकाचे हे प्रातिनिधिक चित्र जिल्हाभर दृष्टीस पडत आहे. कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने भाजीपाला उत्पादक हवालदिल झाला आहे. एका बाजूला खते, औषधांच्या किमती गगनाला भिडल्या असताना शेतमाल कवडीमोल दराने विकले जात असल्याने संपूर्ण अर्थचक्रच विस्कटून कर्जाचे डोंगर वाढू लागले आहेत. त्यात महापूर, अतिवृष्टी, वादळ या नैसर्गिक आपत्तींची भर पडत असल्याने धीर सुटल्यासारखी शेतकऱ्याची परिस्थिती आहे. तरीदेखील यातून तो सावरून नवनवे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे; पण बाजारातील लुटीच्या व्यवस्थेमुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
रेंदाळमधील शेतकरी राजू कोल्हापुरे यांनी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. १ रुपये २० पैसे दराने १० हजारांची रोपे लागली. १५ हजारांची तार, १५ हजारांची काठी, १० हजारांची सुतळी, मल्चिंग पेपर १० हजार, खते १० हजार, औषधे १५ हजार अशी सुरुवातीची गुंतवणूक केली. आणलेल्या तारा, सुतळी, काठी बांधण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला. लागवडीनंतर एक आळवणी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन आळवण्या केल्या. दोनवेळा १० हजारांच्या भांगलणी केल्या. एक फवारणी २ हजार याप्रमाणे ८ फवारण्या केल्या. टोमॅटो लागल्यानंतर तो तोडायला दोन दिवसांनी ८ मजुरांना प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे झालेल्या ८ तोड्यांना १२ हजार ८०० रुपये खर्च केला. एवढे करून तोडलेला माल ४० रुपये कॅरेट या भाड्याने बाजार समितीत पाठविला. तेथे गेलेल्या २४ कॅरेटमध्ये २ किलोची तूट, पुन्हा २ किलोची कपात करून २० किलोच्या कॅरेटला ८० रुपये हातात पडले. दोन महिने पिकाची जोपासना करून, पावसाच्या माऱ्यातून वाचवून, लाख रुपये खर्च करून अखेर बाजारात मिळालेल्या दराने उत्पादकांच्या स्वप्नांचा चिखल करून टाकला.
उत्पन्नापेक्षाही वाहतूक, तोडणीचा खर्च जास्त
टोमॅटोवर करपा, व्हायरस वाढला आहे, त्यावर फवारणीसाठी लागणाऱ्या ६० मिलिच्या एका औषधाच्या बाटलीचा दर दीड हजार रुपये आहे. एका फवारणीचा खर्च दोन हजार रुपये येत असताना एक वेळ माल पाठवला की हातात केवळ ८ हजार रुपये मिळतात. वाहतूक भाड्यापोटी ३२ हजार, तोडणीसाठी १२ हजार ८०० रुपये, असा एकूण ४४ हजार ८०० रुपये एकूण खर्च झाला. मिळालेले उत्पन्न ४० हजार इतके आहे. म्हणजेच वाहतूक आणि तोडणीचा खर्चही निघाला नाही.
माझा दहा एकर ऊस महापुरात बुडाला. निदान भाजीपाला उत्पादनातून तरी कर्जाचा डोंगर कमी होईल या अपेक्षेने लागवड केली; पण व्यवस्थेने आशेवर पाणी फिरविले. आता शेतमालाच्या बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नाहीतर शेतकरी असाच आतबट्ट्यात जाणार.
राजू कोल्हापुरे, टोमॅटो उत्पादक, रेंदाळ
फोटो: ११०९२०२१-कोल-टोमॅटो
फोटो ओळ : दरच नसल्याने वैतागून शेतकऱ्यांनी तोडणी बंद केल्याने लाख रुपये खर्च करून उभा केलेला रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील टोमॅटोचा प्लाॅट असा सडू लागला आहे.