आॅगस्टमध्ये कारवाईचा इशारा
By Admin | Updated: July 4, 2015 00:01 IST2015-07-03T23:48:56+5:302015-07-04T00:01:57+5:30
अजिज कारचे : मिरजेत एलबीटीबाबत व्यापाऱ्यांची बैठक

आॅगस्टमध्ये कारवाईचा इशारा
मिरज : ३१ जुलैपर्यंत अभय योजनेचा लाभ न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी दिला. मिरजेत महापालिकेत आयोजित बैठकीत व्यापाऱ्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले. एलबीटी भरण्याबाबत अभय योजनेत विवरणपत्र भरुन देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दंड व व्याज घेण्यात येणार नाही. मात्र जे व्यापारी ३१ जुलैपर्यंत विवरणपत्रे देणार नाहीत, त्यांची तपासणी व वसुली करण्यात येईल, असेही आयुक्त कारचे यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रातील १५ हजार व्यापाऱ्यांपैकी ८ हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यातील ५ हजार जणांनी एलबीटी कर भरला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. व्यापारी संघटनेच्या विराज कोकणे यांनी, एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी, मात्र एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देऊ नये, अशी मागणी केली.
गजेंद्र कुल्लोळी यांनी, १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द केला नाही, तर व्यापारी आंदोलन करतील असे सांगितले.
एमआयडीसी संघटनेचे बबन भंडारे यांनी उद्योजकांच्या, तर सुवर्णकार संघटनेच्या सुनील चिप्पलकट्टी यांनी सराफांच्या अडचणी मांडल्या. एलबीटी क्रमांक असलेली बिले न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी बैठकीत करण्यात आली.
बैठकीस उपायुक्त सुनील नाईक, सहायक आयुक्त टीना गवळी, कर अधीक्षक अमर छाचवाले, व्यापारी संजय महाजन, अभय गोगटे, संजय शादीजा, वासू मेघाणी, रफीक मत्ते, यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते. गजेंद्र कुल्लोळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सांगलीत चर्चेचे गुऱ्हाळ
मिरजेपाठोपाठ सायंकाळी पाच वाजता एलबीटीप्रश्नी आयुक्तांनी सांगलीत व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एलबीटी भरण्यावर तोडगा काढण्याऐवजी चर्चेचे गुऱ्हाळच अधिक झाले. महिन्याभरात एलबीटी रद्द होणार असताना त्याचा परतावा कसा मिळणार, दंड, व्याज माफी कशी आहे, यावर अधिकवेळ खर्ची झाला. यापूर्वी अनेकदा एलबीटी कायद्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तरीही या बैठकीत पुन्हा कायद्याच्या अंमलबजावणीवर भर दिला गेला.
खासदारांचे आवाहन बेदखल
विवेक कांबळे : एलबीटीप्रश्नी आॅगस्टमध्ये कारवाई
सांगली : महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी थकित एलबीटी भरण्याची हमी दिली होती. खासदार संजयकाका पाटील यांना व्यापाऱ्यांनी शब्द दिला होता. पण त्यांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही. या मुजोर व्यापाऱ्यांवर एक आॅगस्टपासून कारवाई केली जाईल. त्यात खासदार, आमदारांनी हस्तक्षेप करू नये, असे प्रतिपादन महापौर विवेक कांबळे यांनी शुक्रवारी केले.
ते म्हणाले की, व्यापाऱ्यांनी उपोषणावेळी एलबीटी भरण्याचा शब्द खासदार संजयकाका पाटील यांना दिला होता. राज्य शासनाने दंड, व्याज माफ केले, तरीही चार महिन्यात एलबीटी भरलेला नाही. इतर महापालिकेतील व्यापारी कर भरून सहकार्य करीत आहेत, पण सांगलीइतके मुजोर व्यापारी कुठेही नाहीत. शासनाच्या सवलतींचा गैरफायदा त्यांनी घेतला आहे. एक आॅगस्टनंतर काय करता येते, ते व्यापाऱ्यांना दाखवून देऊ, असा इशाराही कांबळे यांनी दिला.
एलबीटीप्रश्नी यापुढे कुठलीही चर्चा होणार नाही. आयुक्तांकडून व्यापाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे. एलबीटी कायद्यानुसार कारवाई करावी. लहान मुले नागरी सुविधांसाठी आंदोलने करीत आहेत. प्रशासन ढिम्मपणे कारभार चालवित आहे. येत्या काळात आयुक्तांनाही वठणीवर आणणार आहोत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
उपमहापौरांची समिती
महापालिकेच्या १३३४ मुव्हेबल खोक्यांत व्यापार करणाऱ्या ५० टक्केपेक्षा अधिक जणांनी भाडे व एलबीटी भरलेला नाही. त्याचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे. त्यांची यादी तयार करून ही खोकी महापालिका ताब्यात घेईल व फेरलिलाव काढेल. त्याशिवाय व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणेही उद्ध्वस्त केली जाणार आहेत. त्यासाठी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करणार असल्याचेही महापौर कांबळे यांनी सांगितले.