रंकाळ्याचा ‘अॅक्शन प्लॅन’ कागदावरच
By Admin | Updated: December 17, 2014 23:02 IST2014-12-17T22:23:39+5:302014-12-17T23:02:44+5:30
ठोस उपायांची गरज : कागदी घोडे नाचविण्यातच प्रशासन आघाडीवर

रंकाळ्याचा ‘अॅक्शन प्लॅन’ कागदावरच
कोल्हापूर : ढासळणाऱ्या संरक्षण भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचीच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होत असलेले पाणी, आदी समस्यांनी ऐतिहासिक रंकाळ्याला घेरले आहे. रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी शासनाकडे करून प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे रंकाळ्याचा कागदावरचा अॅक्शन प्लॅन सत्यात उतरवून रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळा’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. रंकाळ्याची संरक्षक भिंत दोन ठिकाणी पडली आहे. वर्षभरापासून त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. यानंतर पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. शाम हौसिंग सोसायटीकडून थेट तलावात मिसळणारा नाला वळविण्यासाठी दुधाळीपर्यंत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊनही पूर्णक्षमतेने सांडपाणी वळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यापूर्वीही दोनवेळा रंकाळ्यासाठी केंद्राच्या तलाव संवर्धन योजनेतून निधी मिळाला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’च आहे. (प्रतिनिधी)
सांडपाण्याचे दुखणे
शाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. वरचेवर केंदाळाचे दुखणे वर तोंड काढतच असते. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. बोटीमुळे पर्यटनाबरोबरच पाणी ढवळून पाण्यातील आॅक्सिजन वाढण्यासाठीही मदत होणार आहे. प्रशासनाची उदासीनताच रंकाळ्याचे दुखणे वाढवीत आहे.
नुसताच ‘प्लॅन’
तलावाभोवती चोहोबाजूंनी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पडत चाललेल्या संरक्षक भिंतींसह रंकाळ्याची संपूर्ण डागडुजी व मजबुतीकरणासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी देऊन सहा महिने उलटले; मात्र, हा ‘प्लॅन’ काही प्रत्यक्षात ‘अॅक्शन’मध्ये उतरलाच नाही.
उपायांची गरज
संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.
अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.
तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.
नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.
तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.