राज्यात ६४० छापे, दीड कोटींची मालमत्ता हस्तगत
By Admin | Updated: July 3, 2015 01:17 IST2015-07-03T01:17:24+5:302015-07-03T01:17:24+5:30
सतीशकुमार गुरव यांची माहिती : बेकायदेशीर मालमत्ता नऊ कोटी ७६ लाखांपेक्षा जास्त असल्याची नोंद

राज्यात ६४० छापे, दीड कोटींची मालमत्ता हस्तगत
कोल्हापूर : महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगरभूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, आदी कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर १ जानेवारी ते ३० जून २०१५ अखेर ६१२ सापळा कारवाई यशस्वी केल्या आहेत. अपसंपदा (बेकायदेशीर), भ्रष्टाचार २८, असे एकूण ६४० गुन्हे दाखल केले आहेत. संशयित आरोपींकडून सुमारे १ कोटी ४२ लाख २७ हजार ४६३ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सतीशकुमार गुरव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात पुणे, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर, मुंबई अशी आठ परिक्षेत्रांतील शासकीय कार्यालयांत कामाच्या बदली लाच मागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिकांकडून तक्रार आल्यास तत्काळ संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले जाते. अशा राज्यातील महसूल, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद, वीज मंडळ, पंचायत समिती, मार्केटिंग, इंडस्ट्रीज, आरटीओ, आदींसह अन्य कार्यालयांत जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत ६१२ सापळा कारवाई यशस्वी करण्यात आल्या. तसेच अपसंपदा, भ्रष्टाचार २८, असे ६४० गुन्हे दाखल करण्यात आले. संशयित आरोपींकडून सुमारे १ कोटी ४२ लाख २७ हजार ४६३ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. यामध्ये बेकायदेशीर मालमत्ता नऊ कोटी ७६ लाख ५१ हजार ३९५ इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
वृद्ध महिलांसह इतर अनुसूचित जाती-जमाती वर्गातील ९२ तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ११० लोकसेवकांवर कारवाई करण्यात आली. जून २०१४ पर्यंत ३७ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सिद्ध झाले होते. त्या तुलनेत या सहा महिन्यांत ६१ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सिद्ध झाले आहे. एकूण तीन हजार ५८७ प्रकरणे राज्यातील विविध न्यायालयात प्रलंबित आहेत.
विभागवार कारवाई
महसूल विभाग १९१, गृहविभाग (पोलीस) १७७, ग्रामविकास विभाग १११, नगरविकास ४२, महावितरण ३५, आरोग्य विभाग २३, शिक्षण विभाग ३०, वनविभाग २२, सहकार व पणन विभाग ११, पाटबंधारे विभाग ७, आदी शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.
लोकसेवक कारवाई तक्ता
पोलीस १५५, तलाठी ८२, इंजिनिअर ३०, शिक्षक २२, डॉक्टर ११, वकील ४ महापौर-नगरसेवक २, सरपंच ५, सभापती-नगराध्यक्ष ३, त्याचप्रमाणे एकूण ५० महिला लोकसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेल्पलाईनवरून ५५ कारवाया
१०६४ हेल्पलाईनवर राज्यभरातून ६३७० कॉल प्राप्त झाले होते. त्यामध्ये परिक्षेत्रानुसार मुंबई ४, पुणे ६, नागपूर ३१, अमरावती ५, औरंगाबाद ९, अशा एकूण ५५ यशस्वी कारवाई करण्यात आल्या.