सांगलीत ७० महिलांची लाखोंची फसवणूक
By Admin | Updated: July 4, 2015 00:02 IST2015-07-03T23:50:08+5:302015-07-04T00:02:22+5:30
पोलिसात तक्रार : बचत गटांच्या कर्जाचे हप्तेच भरले नाहीत

सांगलीत ७० महिलांची लाखोंची फसवणूक
सांगली : येथील खणभागातील ७० महिलांनी एकत्रित येऊन बचत गट सुरु केला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने तीस हजाराचे कर्ज काढले असून त्याचे हप्ते भरण्यासाठी परविन मुल्ला यांच्याकडे त्यांनी पैसे दिले होते. परंतु, संबंधित महिलेने हे पैसे बँकेत भरलेच नसल्याचे, महिलांनी बँकेकडे चौकशी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. यानंतर महिलांनी सांगली शहर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर या महिलांना परविन मुल्ला यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची माहिती सुनीता शिंगटे व आयेशा नदाफ यांच्यासह बहुसंख्य महिलांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.
या महिला पुढे म्हणाल्या की, आम्ही गरीब कुटुंबातील असून व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळत आहे, म्हणून पाच महिलांचा एक बचत गट तयार केला. त्यानुसार बँकांकडून तीस हजाराचे कर्ज दिले. पण, कर्ज मंजुरीसाठी बँक खाते चालू करण्यासाठी म्हणून प्रत्येक महिलेकडून एक हजार ८०० रुपये व स्टॅम्पसाठी शंभर रूपये भालचंद्र बापट व परविन मुल्ला यांनी घेतले होते. कर्ज मंजुरीचे शुल्क म्हणून प्रत्येक महिलेकडून पुन्हा एक हजार १०० रुपये घेतले आहेत. तीस हजाराचे कर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेतच आमच्याकडून परविन मुल्ला यांनी प्रत्येक महिलेकडून पाच हजार रूपये घेतले आहेत. हे पैसे घेताना, नंतर तुम्हाला देतो, असे सांगितले होते. परंतु, कर्ज मंजूर झाले डिसेंबर महिन्यात, पण आज सहा महिने झाले तरीही मुल्ला यांनी पैसे दिले नाहीत. शिवाय, कर्जाचा हप्ता भरण्यासाठी महिन्याला दिलेले पैसेही बँकेत जमा केले नसल्याचे चौकशीनंतर उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलिसांमध्ये लेखी तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)
मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही : बापट
बचत गटातील महिलांना बँका कर्ज देत नाहीत. म्हणून मी त्या महिलांना बँकेकडून कर्ज मिळवून दिले आहे. सामाजिक काम म्हणून हे केले आहे. या महिलांकडून मी एक रूपयाही घेतलेला नाही, असा खुलासा भालचंद्र बापट यांनी केला. तसेच माझ्यावरील आरोप खोडसाळपणाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खणभागातील ७० आणि सावळज (ता. तासगाव) येथील शंभरहून अधिक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याबद्दल लेखी तक्रार देऊनही पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे, सांगली शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला.