वाहनधारकांकडून ६३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:07+5:302021-04-27T04:26:07+5:30
कोल्हापूर : गेल्या तेरा दिवसांत संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ हजार ४५९ वाहनधारकांवर कारवाई केली. पोलीस प्रशासनाने या ...

वाहनधारकांकडून ६३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल
कोल्हापूर : गेल्या तेरा दिवसांत संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ हजार ४५९ वाहनधारकांवर कारवाई केली. पोलीस प्रशासनाने या वाहनधारकांकडून एकूण ६३ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करून तो शासनाच्या तिजोरीत जमा केला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दि. १४ एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने संचारबंदी पुकारली. यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काही वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. गेल्या तेरा दिवसांत पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे २६१८ दुचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई केली. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर ही जप्त केलेली वाहने कागदपत्रांची छाननी करून नियमानुसार दंड भरून मालकांना परत देण्यात येणार आहेत.
दि. १४ ते २६ एप्रिल या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ हजार ४५९ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६३ लाख ३५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. ही दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली.
विनामास्कप्रकरणी २३ लाख ६१ हजार दंड
पोलीस प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने शहरात संचारबंदी कालावधीत विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाईचे शस्त्र उगारले. गेल्या तेरा दिवसांतं १० हजार ९९४ नागरिकांवर विनामास्कची कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे २३ लाख ६१ हजार २०० रुपये दंड वसूल केला. ही दंडाची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली.