जिल्ह्यात चार दिवसांत ६१ मिलिमीटर वळीव
By Admin | Updated: May 18, 2016 00:28 IST2016-05-17T23:57:38+5:302016-05-18T00:28:11+5:30
ऐन उन्हाळ्यात दिलासा : पिकांना जीवदान, वादळी वाऱ्यामुळे नुकसान

जिल्ह्यात चार दिवसांत ६१ मिलिमीटर वळीव
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत ठिकठिकाणी ६१.२ मिलिमीटर वळीव पाऊस पडला. यामुळे टंचाईग्रस्त गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यातील वळवामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. टंचाईग्रस्त गावांत तसेच उष्णतेने हैराण झालेल्यांना काहीकाळ गारवा अनुभवता आला.
गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. तलाव, विहिरी, आदी जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. दोन महिन्यांपासून पाणीटंचाई तीव्रतेने जाणवत आहे. विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. यावर आधारित पिके करपली आहेत. पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी शेतीच्या पाणीवापरावर निर्बंध आणले आहेत. नदीवरील पाण्यावर उपसाबंदी केली आहे. यामुळे ऊस उत्पादक, उन्हाळी पीक उत्पादक शेतकऱ्यांना वळवाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही तालुक्यांत चार-पाच दिवसांत वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सुकणारी पिके पुन्हा तरारली आहेत.
कागल तालुक्यातील कापशी परिसरात १३ मे रोजी १२ मि.मी., बांबवडे (ता. शाहूवाडी) भागात ३ मि.मी. वळीव झाला. १४ रोजी चंदगड तालुक्यातील कोवाड ४०, माणगाव ४, आजरा ४, मलिग्रे १४, शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर २, सरुड ३, भेडसगाव १, बांबवडे ३ इतका मि.मी. पाऊस झाला. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी ३४, महागाव २६, नूल २०, हलकर्णी ४०, तर जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे २ मिलिमीटर इतका पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, वडगाव येथे एक मिलिमीटर आणि हुपरी ४ मि. मी., कबनूर, रुई येथे प्रत्येकी २ मि. मी. पावसाची नोंद झाली. पन्हाळा तालुक्यातील कोतोली ५, कोडोली ४ मिलिमीटर पाऊस झाला.
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे दि. १५ रोजी ५, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) ३, शाहूवाडी तालुक्यातील सरुड २, भेडसगाव १, बांबवडे येथे ३ मिलिमीटर पाऊस झाला. १६ रोजी खडकेवाडा (ता. कागल) ३, भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे ७, पिंपळगाव व गारगोटी येथे १, गडहिंग्लज तालुक्यातील नूल २५, दुंडगे ५, कडगाव ३, महागाव १५, नेसरी ८, तर हलकर्णी येथे १ मिलिमीटर इतका पाऊस झाला.
गडहिंग्लज तालुक्यावर पावसाची कृपा
चार दिवसांत सर्वाधिक वळीव गडहिंग्लज तालुक्यात पडला आहे. त्या तालुक्यातील पाणीटंचाईने तीव्र असलेल्या येणेचवंडी, बसर्गे, हलकर्णी भागांत प्रचंड जोरदार पाऊस कोसळला. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला.
२४ लाखांचे नुकसान
सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट यांच्यासह पाऊस पडल्याने अनेक घरांची पडझड झाली. झाडे उन्मळून पडली. कागल तालुक्यातील घरांच्या पडझडीत एकूण २३ लाख ९९ हजार २६०, तर गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक व खुर्दमध्ये जनावरांचा गोठे, घरे यांचे ६३ हजारांचे नुकसान झाले आहे.