जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार विद्यार्थी थेट उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:16+5:302021-04-04T04:25:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

4 lakh 60 thousand students in the district passed directly | जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार विद्यार्थी थेट उत्तीर्ण

जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार विद्यार्थी थेट उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, खासगी शाळांमधील ४ लाख ६० हजार विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत.

गेल्यावर्षीही नेमके कोरोनाचा संसर्ग मार्चमध्ये सुरू झाला होता. त्यामुळे परीक्षांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर शाळाही बंद करण्यात आल्या. गेले वर्षभर ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापन करण्यासाठी शाळांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर अभ्यास आणि पाठ पाठवण्यात आले. त्याचा लाभही लाखो विद्यार्थ्यांनी घेतला. खासगी शाळांनी तर काटेकोरपणे ऑनलाईन वर्ग घेतले.

सप्टेंबर २०२० नंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी येऊ लागले. यानंतर डिसेंबरपासून अनेक माध्यमिक शाळा सुरू झाल्या. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट अध्यापन सुरू झाले. परंतु आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अखेर पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाखांवर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाण्यास पात्र ठरले आहेत.

मात्र या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजी दिसून आली. वेगळ्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, शिक्षकांनी अनेक मर्यादा असूनही अध्यापन केले आहे. तेव्हा परीक्षा झाली असती, तरी किमान मुलांची काय तयारी झाली आहे, हे तरी समजले असते, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र सीबीएससी पॅटर्न आणि अन्य खासगी शाळांनी याआधीच ऑनलाईन परीक्षा घेतल्याचे सांगण्यात आले.

चौकट

पहिली ते आठवी विद्यार्थी २ लाख ४८ हजार ८६७

मुली २ लाख ११ हजार ६८५

एकूण ४ लाख ६० हजार ५५२

पहिली ते आठवीपर्यंतची २०२० च्या शैक्षणिक वर्षातील शाळा व विद्यार्थी संख्या

आजरा - १३५ : ८०३३

भुदरगड - १७२ : १०७७३

चंदगड-२१२ : १४४६६

गडहिंग्लज-१५४ : १४४७२

गगनबावडा-७१ : ३०७२

हातकणंगले-३४३ : ५९१८७

कागल-१५४ : २०२३६

करवीर-२३९ : ३६६७०

पन्हाळा-२२७ : २०८९३

राधानगरी-२१५ : १५३६३

शाहूवाडी-२७७ : १४७८८

शिरोळ-२०४ : २६०५६

नगरपालिका विद्यार्थी संख्या

गडहिंग्लज - ०६ : ८७०

इचलकरंजी-४७ : ७१६५

कागल-०६ : ८०२

जयसिंगपूर- १० : ६८६

कोल्हापूर महापालिका

शाळा : १८६ : ७६,७६०

चौकट

सलग दोन वर्षे परीक्षा नाहीत

गेल्यावर्षी दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर होण्याआधी कोरोनाचा कहर सुरू झाला. अखेर दहावीचा हा पेपरच रद्द करण्यात आला. त्यामुळे नंतरच्या कोणत्याही परीक्षा झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या कामगिरीवर मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आणि उत्तीर्ण करण्यात आले. यंदाही सलग दुसऱ्यावर्षी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोट

गेल्या वर्षभरात मुलांना ऑनलाईन शिकवण्यात आले. त्यानुसार मुलांनी अभ्यासही केला आहे. त्याचे मूल्यमापन होण्याची गरज आहे. ऑनलाईन का असेना परीक्षा घेण्याची गरज आहे.

दिलीप गायकवाड, पालक

कोट

गेल्यावर्षीही परीक्षा झालेल्या नाहीत. परीक्षा नाही म्हटले की मुले म्हणावा तसा अभ्यास करत नाहीत. मुलांचा अभ्यास सुरू आहे. ती पास होवोत किंवा नापास; पण परीक्षा होण्याची गरज आहे.

कोमल पाटील, पालक

ग्रामीण भागामध्ये अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मुलांनी गेल्या वर्षभरात शिक्षण घेतले आहे. एक तर प्रत्यक्ष अध्ययन नसल्यामुळे केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवले गेले. त्यामुळे शिकण्यावरही मर्यादा आल्या. अशातच आता यंदाही परीक्षा होणार नसल्याने अप्रत्यक्षरित्या हे विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे.

कविता लोंढे

शिक्षणतज्ज्ञ कोट

कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जरी निर्णय योग्य वाटत असला, तरीही काही ना काही मूल्यमापन होण्याची गरज होती. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही अध्यापन झाले आहे त्याआधारे परीक्षा हाेणे आवश्यक होते. नाही तरी आठवीपर्यंत कुणालाच नापास करायचे नाही, असेच शासनाचे धोरण आहे.

संपत गायकवाड, निवृत्त सहा. शिक्षण संचालक

कोट

कितीही विपरित परिस्थिती असली, तरी परीक्षा दिल्याशिवाय आपण पुढच्या इयत्तेत जाऊ शकतो, असा चुकीचा संदेश या निर्णयामुळे जाऊ शकतो. जे काही जुजबी अध्यापन झाले आहे त्याआधारे का असेना काही ना काही परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याची गरज होती.

भगवान पाटील,

जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: 4 lakh 60 thousand students in the district passed directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.