२८२७ कुटुंबे ‘बेघर’च

By Admin | Updated: December 2, 2014 00:13 IST2014-12-02T00:07:33+5:302014-12-02T00:13:07+5:30

इंदिरा आवास योजना : जिल्ह्यात सहा महिन्यांत फक्त १७ घरांची कामे पूर्ण

2827 families are 'homeless' | २८२७ कुटुंबे ‘बेघर’च

२८२७ कुटुंबे ‘बेघर’च

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -इंदिरा आवास योजनेतून जिल्ह्यात यंदा २८४४ घरांना मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळून सहा महिने उलटले तरी फक्त १७ घरे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २८२७ कुटुंबांना विविध कारणांमुळे घरे पूर्ण करता आलेली नाहीत. त्यांच्या वाट्याचे ‘बेघर’पण अजूनही कायम आहे. पावसाळा संपल्याने आणि लालफितीमधील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घरांच्या बांधकामाला आता गती आली आहे.
गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शासन १ एप्रिल १९९९ पासून ‘इंदिरा आवास’ या नावाने घरकुल योजना राबवत आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंंबाला घर देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय युद्धात मृत्यू पावलेल्या शहीद जवानाची पत्नी किंवा त्याच्या जवळच्या नातेवाइकांनाही योजनेचा लाभ घेता येतो. दारिद्र्यरेषेखालील अपंगासाठी ३ टक्के घरे राखून ठेवण्यात आले आहे. यंदापासून घर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यांत ९५ हजार रुपयांचे अनुदान मिळते. लाभार्थ्याने स्वत:कडील पाच हजार रुपये घालून एक लाखांचे घर बांधणे अपेक्षित आहे. एक लाखांपेक्षा अधिक किमतीचे घर लाभार्थ्याला बांधायचे झाल्यास संबंधित लाभार्थ्याला २० हजार रुपये चार टक्के व्याजाने कर्ज देण्याची तरतूद आहे. शौचालय बांधकामासाठी ‘स्वच्छता मिशन’ योजनेतून १२ हजार रुपये दिले जाणार आहेत.
सन २००२ मध्ये तयार करण्यात आलेल्या बेघरांच्या यादीत नाव असलेल्यांची गावसभेत निवड केली जाते. गावसभेत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. घर मंजुरीनंतर निवडलेल्या लाभार्थ्याला गाव ते तालुकापातळीपर्यंत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा आदेश मिळतो. मात्र, घर मंजूर झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून काम सुरू करण्याचा आदेश मिळेपर्यंत पावसाळा सुरू होतो. पावसाळ्यात घर बांधता येत नाही. त्यामुळे घर मंजूर होऊनही सहा महिने झाले, तरी घर पूर्ण करता येत नाही. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामांचा आदेश मिळत नाही, आदेश मिळाला तरी टप्प्यांनुसार वेळच्यावेळी पैसे मिळत नाही, गावपातळीवर शासकीय यंत्रणेकडून त्वरित सेवा मिळत नाही, अशा अनेक अडचणींमुळे वेळेत घर पूर्ण करता येत नाही, असे योजनेच्या लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे मंजूर होऊन लाभार्थ्याला घर पूर्ण करताना अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागतो. त्यामुळे घर मंजूर झाल्यानंतर ते प्रत्यक्षात बांधून कधी पूर्ण होईल यांची वाट पाहत रहावी लागते.

आठ तालुक्यांत एकही घर पूर्ण नाही..
भुदरगड तालुक्यात पाच, चंदगड एक, करवीर पाच, शिरोळ सहा असे एकूण १७ घरे पूर्ण झाली आहेत. उर्वरित आठ तालुक्यांत एकही घर पूर्ण झालेले नाही. जागा न मिळणे, मजुरांची टंचाई आदी कारणांमुळे शंभर ते दीडशे घरांच्या बांधकामाला अद्याप प्रारंभ झालेले नाही.


पावसाळ्यात घरांचे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे मंजूरी मिळून पूर्ण झालेल्या घरांची संख्या कमी आहे. यापुढील कालावधीत घरांचे बांधकामाला गती येते. तीन टप्प्यांत लाभार्थ्यांना पैसे दिले जात आहे.
- पी. बी. पाटील,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक


मंजूर
घरांची संख्या

आजरा - १२५
गगनबावडा-४४
भुदरगड - ३११
चंदगड - २३३

गडहिंग्लज - ३१७ हातकणगंले - ४०० कागल - १०९
करवीर - २७९

पन्हाळा - २८९ राधानगरी - ३५० शाहूवाडी - २३०
शिरोळ - १५७

Web Title: 2827 families are 'homeless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.