अपहाराचे २५ लाख होणार १५ वर्षांनी वसूल

By Admin | Updated: September 24, 2016 00:01 IST2016-09-24T00:01:54+5:302016-09-24T00:01:54+5:30

जि. प. च्या वित्त विभागाचा निर्णय : शाहूवाडी, हातकणंगलेतील प्रकरणे

25 lakhs of hijacking will be recovered in 15 years | अपहाराचे २५ लाख होणार १५ वर्षांनी वसूल

अपहाराचे २५ लाख होणार १५ वर्षांनी वसूल

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागांतर्गत गेल्या काही वर्षांत झालेल्या ३३ लाख २७ हजार रुपयांच्या अपहारांपैकी अजूनही २५ लाख रुपयांची वसुली बाकी असून, तब्बल १५ वर्षांनी ही रक्कम वसूल होणार आहे. शाहूवाडी, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यांतील ही प्रकरणे आहेत. पैसे हडप करणाऱ्यांपैकी एकाने आत्महत्या केली, तर एकाचे निधन झाल्याने आता त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनातून ही वसुली केली जात आहे.
२00३च्या दरम्यान के. एस. मोमीन (मूळ गाव इस्लामपूर) हे शाहूवाडी पंचायत समितीकडे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी सन २00३-0४ ते २00६-0७ या कालावधीत इंदिरा आवासच्या लाभार्थींचे पैसे आपले नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर जमा करून ११ लाख ९७ हजार ३0६ रुपयांचा अपहार केला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी सही केलेली यादी बँकेत न देता आपल्या सहीची यादी बँकेत देऊन त्या खात्यांवर पैसे जमा करून ते हडप करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला व त्यांची चौकशी सुरू झाली. त्यामुळे त्यांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. आता त्यांच्या पत्नीला जी पेन्शन मिळते, त्यातून दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे आतापर्यंत दोन लाख ६५ हजार १४0 रुपये वसूल करण्यात आले आहेत. नऊ लाख ३२ हजारांची वसुली अजून बाकी आहे. त्यासाठी १५ वर्षे लागणार आहेत.
तसेच हातकणंगले पंचायत समितीकडे वरिष्ठ सहायक म्हणून ए. एम. काटकर २00३-0४ ते २00६-0७ या कालावधीत कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय बिले दुबार टाकून, बोगस बिले तयार करून आठ लाख ८५ हजारांचा अपहार केला होता. त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सुरू असलेल्या कौटुंबिक निवृत्तिवेतनातून दरमहा पाच हजार याप्रमाणे आतापर्यंत दोन लाख ८0 हजार रुपये वसूल झाले असून, अजून १0 वर्षांनी उर्वरित सहा लाख रुपयांची पूर्ण वसुली होणार आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन सहा. लेखाधिकारी मिसाळ यांच्या ३ वेतनवाढी रद्द करण्यात आल्या होत्या.

एखाद्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्याने अपहार केला आणि तो सिद्ध झाला तर त्याच्या भविष्यनिर्वाह निधीतून त्या रकमेची वसुली करता येते. त्याच्या निवृत्तिवेतनातूनही कपात करता येते.
तसेच त्याच्या निधनानंतर जे कौटुंबिक निवृत्तिवेतन सुरू असते, त्यातून चरितार्थासाठीची आवश्यक रक्कम वजा जाता ठरावीक रक्कम कपात करून भरपाई करून घेतली जाते. वरील तीनही प्रकरणांमध्ये पाच हजार रुपयांची कपात कौटुंबिक निवृत्तिवेतनातून करण्यात येते.

या वसुलीसाठी अजून बराच काळ
गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक लेखाधिकारी म्हणून २00१ ते २00६ या कालावधीत कार्यरत असणारे कसबा सांगाव येथील आर. आर. जाधव यांनी १२ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार केला होता.

वैद्यकीय बिले दोन-दोनवेळा काढणे, व्यवसाय कर भरण्याऐवजी तो खिशात घालणे, कर्मचाऱ्यांच्या रिकरिंगची रक्कम पोस्टात न भरणे आणि मैलकुलींचा पगार हडप करून या रकमेचा अपहार केला होता.
 

Web Title: 25 lakhs of hijacking will be recovered in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.