विनाकारण फिरणारे २३१ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:46+5:302021-05-24T04:21:46+5:30

भारत चव्हाण / कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तुलनेने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असताना तसेच संचारबंदीचे निर्बंध असताना विनाकारण ...

231 positives moving for no reason! | विनाकारण फिरणारे २३१ पॉझिटिव्ह!

विनाकारण फिरणारे २३१ पॉझिटिव्ह!

भारत चव्हाण / कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तुलनेने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असताना तसेच संचारबंदीचे निर्बंध असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. दुसऱ्या लाटेत अशा मोकाट फिरणाऱ्या ४,४२७ नागरिकांना पकडून त्यांच्या महापालिकेच्या पथकामार्फत ॲंटिजन चाचण्या करण्यात आल्या, त्यात २३१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. हा एक कारवाईचा भाग असला तरी त्यामुळे संसर्ग रोखण्यासही मदत झाली.

जिल्ह्यात आणि शहरात संचारबंदी, लॉकडाऊन असूनही नागरिक वेगवेगळी कारणे शोधून रस्त्यावर मोकाट फिरत आहेत. त्यांना ना कोरोनाचे गांभीर्य ना त्यांच्या कुटुंबीयांची चिंता! सकाळी ११ वाजल्यापासून संचारबंदी असताना नागरिक रस्त्यावर येत असल्याचे पाहून महापालिका प्रशासनाने जो रस्त्यावर येईल, त्याची सक्तीने ॲंटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील एक पथक स्थापन केले होते, नंतर रोज दोन ठिकाणी दोन पथके कार्यरत ठेवली. रस्त्यावर अशी चाचणी होतेय म्हटल्यावर काही महाभागांनी आपले मार्ग बदलले; पण फिरणे थांबिवले नाही.

-दंड भरू; पण बाहेर फिरू-

साने गुरुजी वसाहत परिसरात घडलेला हा किस्सा आहे. एक सेवानिवृत्त व्यक्ती रोज सकाळी फिरायला जायची. लॉकडाऊनमध्ये सकाळी फिरताना त्यांना पोलिसांनी पकडले आणि ५०० रुपये दंड केला. दंड भरल्यामुळे दुसऱ्या दिवशी फिरणे बंद होणे अपेक्षित होते. पण दुसऱ्या दिवशीही त्याच पोलिसांना पुन्हा ती व्यक्ती सापडली. पुन्हा ५०० रुपयांची पावती फाडली. तिसऱ्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार घडला. शेवटी त्या व्यक्तीने पुढील १० दिवसांचे ५ हजार आत्तात घ्या, अशा शब्दात पोलिसांनाच सुनावले. त्या व्यक्तींची फिरण्याची हौस पाहून त्याला पोलीस ठाण्यात नेऊन काही तास थांबवून ठेवले. पण त्या व्यक्तीचे एकच म्हणणे होते... दंड भरू, पण बाहेर फिरू. आता बोला!

-दुसऱ्या लाटेत रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी-

दुसरी लाट सुरू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने १७ एप्रिलपासून अशा रिकामटेकड्यांचा बंदोबस्त करण्याकरिता ॲंटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रविवारपर्यंत शहरात विविध ठिकाणी ४,४२७ व्यक्तींच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या, त्यापैकी तब्बल २३१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांना कोरोना झाल्याचे माहीतही नव्हते. अशा कारवाईतून एक चांगले झाले की, त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता आला.

-कोणाचा दवाखाना तर कोणाचा भाजीपाला-

अत्यावश्यक कारणासाठी काहीशी सवलत देण्यात आल्यामुळे कोणी भाजी आणायला निघालोय, कोणी दवाखान्यात निघालोय तर कोणी नातेवाईक मयत झाल्याने तिकडे निघालोय असे सांगून महापालिका पथकांची तसेच पोलिसांची दिशाभूल करत आहेत. शहरातील काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांना पास दिले आहेत. पण पथकातील अधिकारी, कर्मचारी ‘कुठे जायचे तिकडे जा पण आधी ॲंटिजन करून घ्या’ अशा शब्दात संबंधित व्यक्तीला झापत आहेत.

Web Title: 231 positives moving for no reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.