जिल्ह्यात २०९ जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:29+5:302021-06-16T04:33:29+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत तब्बल २०९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

जिल्ह्यात २०९ जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू
कोल्हापूर : जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत तब्बल २०९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १०७ जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णांना उशिरा दाखल करण्याचा हा तोटा असून त्यामुळे उपचार सुरू करण्याचीही संधी डॉक्टरांना मिळालेली नाही.
ज्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू येतो, अशांची नोंद ‘ब्रॉट डेथ’ या प्रकारामध्ये केली जाते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने उपचार सुरू करूनही ज्यांचा मृत्यू होता त्यांची नोंद ‘इर्मजन्सी डेथ’ या प्रकारामध्ये करण्यात येते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांत २ हजार ४२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील १०७ जणांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच वाटेतच मृत्यू झाला आहे तर १०२ जण कोरोना पॉझिटिव्ह नव्हते तरी त्यांना इतर आजार होते; परंतु त्यांनाही रुग्णालयात उपचार घेण्याची संधीच मिळालेली नाही.
दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये अनेकांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाल्याने त्यांना ऑक्सिजन बेडची गरज भासू लागली. गडहिंग्लजसारख्या वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेल्या शहरातही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असेल तर केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या रुग्णांची सोय त्या ठिकाणी होऊ शकते. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य विभागांमध्येही आहे.
उपजिल्हा रुग्णालयांमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयांमध्ये जे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत त्यांना बरे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना थेट रुग्णवाहिकेतून मोठ्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात दाखल करणे याला पर्याय नसतो. त्याच पद्धतीने कोरोना झाला नसला तरी देखील तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका येणे, रक्तदाब एकदम वाढणे किंवा कमी होणे यासह अनेक कारणांमुळे रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दाखल असल्याने सर्वसाधारण रुग्णांना बेड मिळतानाही अडचणी येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे अशा जिल्ह्यांतील एकूण २०९ जणांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच प्राण गमवावा लागला.
चौकट
रुग्णालयात विनाविलंब दाखल करण्याची गरज
रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी विलंब केल्यास काय होते याचे हे उदाहरण आहे. कारण गेल्या साडेपाच महिन्यांत रुग्णालयात दाखल होण्याआधी २०९ जणांचा मृत्यू झाल्याने ज्यांना व्याधी आहेत अशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही दक्षता घेण्याची गरज आहे.