१७ हजार ५०० लाभार्थी बोगस

By Admin | Updated: August 29, 2015 01:06 IST2015-08-29T01:05:55+5:302015-08-29T01:06:10+5:30

‘संजय गांधी’ योजना : पालकमंत्र्यांची माहिती; चौकशी सुरू

17 thousand 500 beneficiaries bogus | १७ हजार ५०० लाभार्थी बोगस

१७ हजार ५०० लाभार्थी बोगस

कोल्हापूर : जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना समितीमधील ‘श्रावणबाळ’सह विविध योजनांचे १७ हजार ५४४ लाभार्थी संभाव्य अपात्रतेच्या यादीत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून, प्रशासनावर दबाव टाकून अरेरावीची भाषा चालू देणार नाही, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता दिला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनच्या निकषांत न बसणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत काहीजण हे सरकार गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतत आहे, अशी टीका करीत आहेत; परंतु आपल्या सरकारचा तसा कोणताही उद्देश नाही; कारण संजय गांधी योजनेतील ‘श्रावणबाळ’सह विविध योजनांकरिता कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने अध्यादेश काढला होता.
त्यामध्ये या योजनांमधील पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांचे दरवर्षी सोशल आॅडिट करून, यामध्ये नियमबाह्य लाभार्थी सापडल्यास त्याला संंबंधित अधिकारी तत्काळ अपात्र करून त्याचे अनुदान बंद करू शकतो, अशी तरतूद होती. त्याशिवाय या अपात्र लाभार्थ्याला कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नव्हती; परंतु याची अंमलबजावणीच न करता इथून मागे प्रशासनावर दबाव आणून नियमबाह्य कामे झाली आहेत. आमच्या सरकारने उलट या अध्यादेशात (पान ७ वर)

ांद्रकांतदादा-मुश्रीफ आमने सामने
चार महिन्यांपूर्वी साखर कारखान्यांना पॅकेजची रक्कम मिळावी म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यावेळीही या दोघांत जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता पुन्हा संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांवरुन हे दोघे आमने सामने ठाकले आहेत.
या बोगस लाभार्थांबाबत चौकशी सुरू झाल्याने कागल तालुक्यात आंदोलनाचे रान उठले आहे. सरकार गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतत असल्याची टीका सुरु आहे. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.
कागल तालुक्यात सध्या झुंडशाही सुरू असल्याची टीका करीत सरकारी यंत्रणेवर दबाव आणून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले, येथील तहसीलदार जीव मुठीत धरून काम करीत आहेत. ते माझी बदली गडचिरोलीला करा; पण मी इथे काम करणार नाही, असे म्हणत आहेत.
यावरून येथील परिस्थितीचा अंदाज येतो; परंतु आपण सरकारमधील जबाबदार मंत्री या नात्याने सर्व सरकारी यंत्रणेला आश्वस्त करतो की, सरकार आपल्या पूर्ण पाठीशी आहे. जर कोणी अशी अरेरावी व मुजोरीची भाषा करीत असेल तर ती चालू देणार नाही. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल; परंतु सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नियमबाह्य काम करू नये; अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारू.

कागलमध्ये सर्वाधिक अपात्र लाभार्थी
जिल्ह्यातील संभाव्य अपात्र लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक कागल विधानसभा मतदारसंघात ३ हजार ६२५ व त्या खालोखाल कोल्हापूर दक्षिणमध्ये ३ हजार ५११ लाभार्थी आहेत. त्याबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघात ३ हजार १०९ व भुदरगडमध्ये २ हजार ८१२ लाभार्थी असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (आणखी वृत्त २)
 

Web Title: 17 thousand 500 beneficiaries bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.