१३ जागांसाठी १७ उमेदवार रिगणात
By Admin | Updated: January 13, 2015 00:49 IST2015-01-13T00:42:53+5:302015-01-13T00:49:27+5:30
पंचगंगा साखर कारखाना निवडणूक : ‘ब’ वर्ग संस्था गटातून बंडा माने बिनविरोध

१३ जागांसाठी १७ उमेदवार रिगणात
इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज, अंतिम दिवशी उत्पादक गटातील १२ जागांसाठी १७ उमेदवार व ‘ब’ वर्ग अनुत्पादक व्यक्ती गटाच्या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. परिणामी दोन्ही गटांच्या निवडणुकीसाठी २४ जानेवारीला मतदान होणार आहे.
‘ब’ वर्ग अनुत्पादक संस्था गटामध्ये बंडा आप्पा माने यांचा एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे माने यांची निवड बिनविरोध झाली. या गटातून पी. एम. पाटील यांनी माघार घेतली. ‘अ’ वर्ग उत्पादक गटात विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांमध्ये अध्यक्ष पाटील (कबनूर), कुमार खूळ (रुई), धनगोंडा पाटील (कोथळी), जयपाल कुंभोजे (गौरवाड), एम. आर. पाटील (लाट), जिवनधर पाटील (बोरगाव), कल्लू पिराई (पट्टणकोडोली), सुनील तोरगल (सदलगा) हे सर्व विद्यमान संचालक, रावसाहेब भगाटे (नांदणी), प्रताप नाईक (घालवाड), लक्ष्मण निंबाळकर (हेर्ले) व राजगोंडा पाटील (टाकवडे) या नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. याच गटात विरोधी मगदूम गटातून माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम (निमशिरगाव), रमेश चौगुले (चिंचवाड), बाबूराव सादळकर (ढोणेवाडी), नारायण कांबळे (शिरदवाड) व सातगोंडा पाटील (जांभळी) हे निवडणूक लढवीत आहेत.
‘ब’ वर्ग व्यक्ती गटात पाटील पॅनेलचे दिलीप महाजन (माणगाव) विरुद्ध मगदूम गटाचे सुकुमार गडगे (इचलकरंजी) यांच्यात लढत होईल. ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग अशा स्वतंत्र मतदान पत्रिका असून, कारखाना कार्यस्थळावर रत्नदीप हायस्कूलमध्ये २९ मतदान केंद्रांवर २४ जानेवारीला मतदान होईल, तर २५ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. महेश कदम व सहायक निवडणूक अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली. बहुराज्य सहकार कायद्याप्रमाणे निवडणुकीची घोषणा उद्या, बुधवारी होणाऱ्या सभेत करण्यात येईल. (प्रतिनिधी)
समझोत्याचा प्रयत्न निष्फळ
पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सत्तारूढ पाटील पॅनेलकडून चिकाटीने प्रयत्न करण्यात आले. कोल्हापूर येथील एका विद्यमान आमदाराचा ‘विरोधी मगदूम गटाबरोबर समझोता करा’, असा निरोप सत्तारुढांना आल्याने उमेदवारी माघार घेण्याची मुदत तीन वाजता संपली असली, तरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत केलेले प्रयत्न हेकेखोरपणामुळे निष्फळ ठरले.