ऊस खरेदी कर माफीतून १५१ कोटी
By Admin | Updated: June 9, 2014 01:11 IST2014-06-09T01:00:07+5:302014-06-09T01:11:44+5:30
कोल्हापूर विभागात फायदा : सहवीज निर्मिती करणारे ११ कारखाने मदतीविना

ऊस खरेदी कर माफीतून १५१ कोटी
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
राज्य शासनाने हंगाम २०१३-१४मध्ये गाळप झालेल्या उसाचा खरेदी कर माफ केला आहे. याचा फायदा कोल्हापूर विभागातील २१ साखर कारखान्यांना होणार आहे. यामुळे विभागातील कारखान्यांना तब्बल १५१ कोटी ४७ लाख ९७ हजार रुपये मदत होणार आहे. टनाला १५० रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. सहवीजनिर्मिती प्रकल्पामुळे अकरा कारखान्यांना या करमाफीचा थेट फायदा होणार नाही.
साखरेच्या घसरलेल्या दरामुळे यंदा साखर उद्योग अडचणीत आहे. उसाचा उत्पादन खर्च वाढत चालल्याने शेतकरी संघटनांनी तीन हजार प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती. पण हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेचे दर घसरल्याने हा दर कारखान्यांच्या आवाक्याबाहेर होता. ‘एफ.आर.पी.’ प्रमाणे दर देणे बंधनकारक असल्याने कारखान्यांची गोची झाली होती. दर तर द्यावा लागणार पण पैशाची तरतूद कशी करायची, या पेचात कारखानदार अडकले होते. यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी झाली. दराची कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राची मदत घेतलीच, पण त्याबरोबर कारखान्यांकडून घेण्यात येणारा ऊस खरेदी कर माफ करण्याची तयारीही दर्शविली होती. त्यानुसार राज्य शासनाने हा कर माफ केला आहे.
यावर्षी कोल्हापूरचे १ कोटी १५ लाख ५५ हजार १८२, तर सांगलीचे ७२ लाख ५७ हजार ६९४ टन असे विभागाचे १ कोटी ८८ लाख १२ हजार ८७६ टनाचे गाळप झाले आहे. पण कोल्हापूरमधील पंचगंगा, शाहू, वारणा, जवाहर, दत्त-शिरोळ, बिद्री, मंडलिक, कुंभी या आठ व सांगली जिल्ह्यातील विश्वास-शिराळा, क्रांती-कुंडल, सोनहिरा या कारखान्यांचे सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे या कारखान्यांकडून ऊस खरेदी कर घेतला जात नसल्याने परत देण्याचा प्रश्न येत नाही. या अकरा कारखान्यांचे गाळप ८७ लाख १४ हजार २२८ टन झाले आहे. त्यामुळे उर्वरित कारखान्यांना ऊस खरेदी करमाफीचा लाभ प्रत्यक्षात होऊ शकतो. म्हणजे १ कोटी ९८ हजार ६४८ टनाला १५१ कोटी ४७ लाख ९७ हजार २०० रुपये खरेदी कर माफ होणार आहे.