चाफवडेतील १५० कुटुंबांना घराचा मोबदला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST2021-05-25T04:27:33+5:302021-05-25T04:27:33+5:30
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील ज्यांची शेती धरणाच्या एका बाजूला व गाव दुसरीकडे आहे अशा चाफवडे ...

चाफवडेतील १५० कुटुंबांना घराचा मोबदला देणार
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील ज्यांची शेती धरणाच्या एका बाजूला व गाव दुसरीकडे आहे अशा चाफवडे येथील १५० कुटुंबांना पुनर्मुल्यांकन करून घरांचा मोबदला देण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या प्रकल्प आढावा बैठकीत झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीतून कृष्णाखोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक रजपूत यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा केली व घरांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. या लोकांना घरांचा मोबदला मिळालेला नाही. कारण ही घरे बुडीत क्षेत्रात येत नाहीत परंतु त्यांची शेती एका बाजूला व दुसरीकडे घरे येतात व मध्ये धरण येत असल्याने त्यांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल अशा विविध पर्यायांवर यापूर्वी विचार केल्यानंतर घरांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. खास बाब त्यास मंजुरी देऊ असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न १५ जूनपर्यंत मार्गी लावावेत, त्यांना योग्य मोबदला द्यावा, या प्रकल्पातील आक्षेपार्ह जमिनी व अडचणीबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पर्यायी योग्य तो मार्ग काढावा असेही मंत्री पाटील यांनी बजावले. जिल्हाधिकारी कार्यालयात उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार (पुनर्वसन) वैभव पिलारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, धरणग्रस्तांचे प्रतिनिधी धनाजी गुरव, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव उपस्थित होते
मंत्री पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावरुन लागेल ती मदत करु. या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केली आहे त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा. कोणाचेही आर्थिक नुकसान होता कामा नये. ज्यांची घरे बाधित झाली आहे.
यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई, धनाजी गुरव, संजय तरडेकर यांनी विविध मागण्या केल्या. या प्रकल्पामुळे बाधितांना संकलन रजिस्टर नुसार जमीन देण्यात यावी, आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका, संपादित केल्या जाणाऱ्या घरांचे योग्य ते मूल्यांकन करा, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय द्या असा आग्रह धरला. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी उचंगी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
--
हेक्टरी ४० लाखांची मदत
आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे यांनी या प्रकल्पामध्ये २८८ प्रकल्पग्रस्त असून चार गावे बाधित आहेत. प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ४० लाख रुपयांप्रमाणे रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली. ज्या प्रकल्पग्रस्तांना अत्यंत कमी रक्कम स्वेच्छा पुनर्वसन अनुदान म्हणून मिळाली आहे त्या २० लोकांना वाढीव सानुग्रह अनुदानासाठी फेरप्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला.
कोट :
प्रकल्प मार्गी लागायचा असेल तर मूलभूत प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय व्हायला हवेत. जिल्हाधिकारी व प्रातांधिकारी यांनी घेतलेला आढावा मान्य आहे.
संपत देसाई
धरणग्रस्त नेते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
-निर्वाह क्षेत्र पुनर्वसनाकरिता अपात्र ठरलेल्या ४० लोकांच्या जमिनींबाबत फेर तपासणी.
-पुनर्वसनासाठी चितळे व जेऊर या गावातील संपादित गायरान जमिनीचे तातडीने वाटप.
-प्रकल्पग्रस्तांना जेथील जमिनी दिल्या आहेत त्याच गावातील वाढीव गावठाणमधील भूखंडाची पाहणी अहवाल करणे.
----
फोटो नं २४०५२०२१-कोल-उचंगी बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. यावेळी ए. वाय. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, धनाजी गुरव, संपत देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--