लहान मुलांसाठी १५० बेड राखीव ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:48+5:302021-05-24T04:23:48+5:30

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग ...

150 beds will be reserved for children | लहान मुलांसाठी १५० बेड राखीव ठेवणार

लहान मुलांसाठी १५० बेड राखीव ठेवणार

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर काय करायचे याचे नियोजन केले. त्यानुसार जुलैमध्ये ही लाट येईल असे गृहीत धरून सीपीआर, आयसोलेशनसह आयजीएममध्ये पहिल्या टप्य्यात १५० बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. खासगी दवाखान्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार बैठक घेऊन ही माहिती दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यभरातील बालरोगतज्ज्ञांशी वेबीनारद्वारे संवाद साधला. त्याला अनुसरून पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापुरातील बालरोगतज्ञांसमवेत तातडीने बैठक घेतली. प्राथमिक चर्चा झाली, त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा सविस्तर बैठक घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. लहान मुलांसमवेत उपचार करताना विशेष दक्षता घ्यावी लागते, शिवाय त्यांच्यासोबत पालकांनाही ठेवावे लागणार असल्याने त्यापद्धतीनेच नियोजन केले जाणार आहे. आयसीयू आणि व्हेंटिलेंटरने परिपूर्ण बेड सरकारी दवाखान्यातच उपलब्ध व्हावे म्हणून सीपीआर, आयसोलेशन, आयजीएम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.

वयोगटनिहाय वर्गवारी होणार

जिल्ह्यात आजच्या घडीला १८ वर्षांखालील बालकांची संख्या साधारपणे १० लाखांच्या घरात आहे. पण पुढे उपचारात सुसूत्रता यावी म्हणून वयोगटनिहाय वर्गवारी करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. आज, सोमवारीच त्याची यादी तयार होणार आहे. त्यात २ महिने ते ३ वर्षापर्यंतची बालके, ५ वर्षांपर्यंतची, १० वर्षांपर्यंतची आणि १८ वर्षांखालील किती अशी वर्गवारी निश्चित होणार आहे.

टास्क फोर्स ठरवेल तेच उपचार

कोरोनावरील उपचाराच्या बाबतीत ॲलोपॅथी, होमिओपॅथी असा सध्या बराच काथ्याकुट केला जात असलातरी टास्क फोर्सने घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार कोरोनाबाधितावर उपचार होत आहे, त्यात बदल होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गरज असेल तरच बाहेर पडा

लॉकडाऊन शिथिल झाला असलातरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे सूट दिली म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका, नियम पाळा, गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. माझा जीव मीच वाचवणार या जबाबदारीतून कोल्हापूरकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच शंभर टक्के मास्क वापरा. मास्क नाही म्हणून कारवाई होणे हे दुर्दैवी असून कारवाई झाली नाही असा दिवस उगवू दे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

अकराच्या आत घरात

कोरोनाचे आकडे कमी झालेले नसल्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या ७ ते ११ या वेळेचे पालन करा. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी म्हणून सातच्या आत घरात अशी शपथच जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

Web Title: 150 beds will be reserved for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.