अनिकेत घमंडी/मुरलीधर भवार
डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील शेअर रिक्षाचे किमान व वेगवेगळ्या अंतरासाठीचे असलेले भाडे, तसेच स्वतंत्र रिक्षा केल्यास त्याचे टप्प्यानुसार भाडे, याचे दरपत्रक कल्याण आरटीओने कोणत्याही रिक्षा स्टँडपाशी लावले नसल्याने रिक्षाचालकांना लुटमारीचा परवानाच मिळाला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या लुटालुटीला आरटीओची मूक संमती असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
डोंबिवली, कल्याणमध्ये फारच थोडे अधिकृत व अनेक बेकायदा स्टँड आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या रिक्षा युनियनचा वरचष्मा निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या बेकायदा स्टँडपाशी आरटीओने दरपत्रक लावले, तर बेकायदा स्टँडला मान्यता दिल्यासारखे होईल, म्हणून आरटीओने अधिकृत स्टँडपाशीसुद्धा दरपत्रक लावलेले नाही, असे आरटीओचे अधिकारी खासगीत सांगतात. दरपत्रक महापालिकेने लावावे, असे सांगून आरटीओने जबाबदारी झटकली आहे.
तेवढे भाडे आकारले नसते
२३ जानेवारी २०२५ रोजी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एखाद्या प्रवाशाने स्वतंत्र रिक्षा केल्यास त्याला सीएनजी रिक्षासाठी १.५ किमीकरिता (पहिला टप्पा) किमान भाडे २६ रुपये जाहीर केले आहे. आरटीओने दरपत्रक लावले असते, तर सध्या प्रवाशांकडून आकारले जाणारे ३० रुपये भाडे आकारले गेले नसते. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
जबाबदारी झटकली
कल्याण आरटीओ क्षेत्रात अधिकारी सर्व्हे करणार होते, तो सर्व्हे झाला नाही. त्यामुळे अधिकृत स्टँड किती, अनधिकृत किती, याची नोंद नसल्याने आरटीओची अडचण झाल्याने दरपत्रक लावणार तरी कोणकोणत्या स्टँडवर, असा पेच त्यांच्यासमोर असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे. पालिकेने दरपत्रक लावावेत, अशी अतार्किक भूमिका आरटीओने घेत आपली जबाबदारी पालिकेवर ढकलली आहे.
अधिकृत भाडे आकारणीचे दरपत्रक जेवढे अधिकृत रिक्षा स्टँड आहेत, तेथे दर्शनी भागात का लावले जात नाही. त्यामुळे रिक्षाचालक-प्रवाशांमध्ये संघर्ष होतो, त्याला जबाबदार आरटीओ आहे, असे स्पष्ट मत आहे. दरपत्रक लावा, संघर्ष टाळा, जनजागृती आपोआपच होईल.
दत्ता माळेकर, कार्याध्यक्ष, रिक्षाचालक-मालक युनियन, डोंबिवली
रिक्षा स्टँडवर भाडे आकारणीचे दरपत्रक लावणे ही आरटीओची जबाबदारी आहे. मात्र, अनेक वर्षे मागणी करूनही डोंबिवली पश्चिम, पूर्वेला कुठेही दरपत्रक लावले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षाचालक-मालक संघटना