‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

By अनिकेत घमंडी | Updated: June 10, 2025 05:54 IST2025-06-10T05:53:26+5:302025-06-10T05:54:35+5:30

बारा वर्षांत लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेने त्यांचे म्हणणे खरे करून दाखवत वंदे भारत, एसी लोकल आणल्यामुळे उपनगरी लोकल आणखी विलंबाने धावत आहेत. अनेक दिवसांत एकही दिवस लोकल वेळेवर धावलेल्या नाहीत.

AC hits ordinary passengers, local passenger count at 21 lakh: New local trips have not increased since 2012 | ‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील २१ लाख प्रवासी २०१२ पासून वाढीव लोकल फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. इच्छा नसतानाही त्यांच्या माथ्यावर एसी लोकल आणून रेल्वेने सामान्य प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, दिवा, मुंब्रा, कळवा येथील प्रवाशांना दरवाजात लटकत, लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची वाढलेली संख्या व त्या तुलनेत न वाढलेल्या लोकल या व्यस्त प्रमाणाचा फटका ठाणे व त्यापुढील प्रवाशांना बसत आहे.

बारा वर्षांत लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेने त्यांचे म्हणणे खरे करून दाखवत वंदे भारत, एसी लोकल आणल्यामुळे उपनगरी लोकल आणखी विलंबाने धावत आहेत. अनेक दिवसांत एकही दिवस लोकल वेळेवर धावलेल्या नाहीत.

दिवा, मुंब्रा, कळव्यातील प्रवासी बेहाल

विशेषतः डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. कर्जत, कसारा, खोपोलीच्या लोकल तुडुंब भरून येतात. आता बदलापूर, आसनगाव, टिटवाळा लोकलदेखील खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे समस्या वाढली असून, या प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. अनेकांना पाच-सहा लोकल सोडून मग मोठ्या हिमतीने लोकलमध्ये कसेबसे चढावे लागते.

एसी लोकल विलंबाने वेळापत्रक कोलमडले

एसी लोकलच्या ८० फेऱ्या मध्य रेल्वेवर होतात. १६ एप्रिलपासून त्यात वाढ करण्यात आली. एसी लोकल कधीही वेळेवर येत नाहीत. उलट त्या लोकलमुळे अन्य सामान्य लोकल उशिरा धावतात. एसी लोकलला प्रवाशांचा विरोध नाही; परंतु त्या वेळेत धावत नसल्याची खंत आहे. त्यामुळे वेळापत्रकाचा बोजवारा उडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना त्यामुळे कामाच्या ठिकाणी दररोज लेटमार्कला सामोरे जावे लागते.

लोकलपेक्षा लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य ठरते घातक

लांब पल्ल्याच्या गाड्या लोकलपुढे काढल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडत आहे. त्यामुळे जी लोकल येईल त्यात कसेही चढायचे आणि प्रवेश मिळवायचा अशी जीवघेणी स्पर्धा प्रवाशांमध्ये सुरू असते, त्यात अनेकांचा जीव जातो किंवा जखमी होतात. कामावर वेळेवर जायचे असल्याने प्रवासी निमूटपणे सहन करत प्रवास करतात.

Web Title: AC hits ordinary passengers, local passenger count at 21 lakh: New local trips have not increased since 2012

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.