निवडणुकीमुळे रेंगाळणार भातकापणीची कामे
By Admin | Updated: September 26, 2014 01:55 IST2014-09-26T01:53:36+5:302014-09-26T01:55:08+5:30
विधानसभा निवडणुकीचा शिक्षक, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. तसाच शेतकऱ्यांनाही ऐन पिकरातीतच निवडणूक आल्याने शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणार नाहीत

निवडणुकीमुळे रेंगाळणार भातकापणीची कामे
भातसानगर : विधानसभा निवडणुकीचा शिक्षक, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. तसाच शेतकऱ्यांनाही ऐन पिकरातीतच (कापणीचा हंगाम) निवडणूक आल्याने शेतीसाठी आवश्यक मजूर मिळणार नाहीत. मिळाले तरी त्यांच्या भडकलेल्या मजुरीमुळे ते परवडणार नसल्याने भातकापणी कामे रेंगाळत आहेत.
शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामासाठी मजूर मिळतात़ यंदा मात्र ऐन पिकरातीतच निवडणुका आल्याने विभागवार, गाववार विविध पक्षांच्या निवडणुकीसाठी सभा, बैठकांसाठी जेवणावळीसह हातखर्च मिळतो़ यामुळे कातकरी, आदिवासी व इतर मजूर शेतीचे काम करण्याऐवजी अशा कार्यक्रमांना जातात. त्यातच प्रचारामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या विभागातील ताकद दाखविण्यासाठी अशा मजुरांना सुरुवातीपासूनच आपल्या अधिपत्याखाली ठेवतात. त्यामुळे कापणीकामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील बहुतांश भातपिके आणखी १० ते १२ दिवसांत पिवळीधम्मक होऊन कापणीवर येतील. वाढत्या मजुरीबरोबर निवडणुकांमुळे ते शेतकऱ्यांना उपलब्ध होणार नसल्याने या वर्षी कापणीची कामे रेंगाळणार आहेत. (वार्ताहर)