Indian Railways Facts: तुम्ही कधीना कधी रेल्वेनं प्रवास केसा असेलच. प्रवास करत असताना अनेक रेल्वे समोर जाताना किंवा बाजूनं जाताना पाहिल्या असतील. अशात कधीना कधी तुम्ही पाहिलं असेल की, प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉस (X) अशी खूण असते. पण अलिकडेच नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉसची खूण नसते. पण यामागचं कारण काय आहे? तुम्हालाही माहीत नसेल तर आता जाणून घ्या.
रेल्वेच्या डब्यावर 'X' निशाण का असतं?
तुम्हाला माहीत नसेल, पण भारतात धावणाऱ्या सगळ्यात पॅसेंजर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर 'X' अशी खूण असते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, सगळ्याच पॅसेंजर रेल्वेंच्या शेवटच्या बोगीवर ही खूण अनिवार्य आहे. X ही खूण प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेवर लावण्यात येते. याचा अर्थ होतो की, हा त्या रेल्वेचा शेवटचा डबा आहे. ही खूण पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची असते.
तसेच रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X खूणेसोबतच LV लिहिलेलं असतं. ज्याचा अर्थ 'Last Vehicle' असा होतो. ही खूण रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना देते की, हा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. जर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर या दोन्हीपैकी एकही खूण दिसत नसेल तर याचा अर्थ असा होतो की, रेल्वेचे काही डबे रेल्वेपासून वेगळे झाले आहेत. अशाप्रकारणे ही खूण कर्मचाऱ्यांना अलर्ट करते.
वंदे भारतमध्ये का नाही X ही खूण
वंदे भारत रेल्वेबाबत सांगायचं तर याच्या शेवटच्या डब्यावर X अशी खूण नसते. कारण वंदे भारत ही एक हाय स्पीड रेल्वे आहे आणि ती पूर्णपणे अटॅच्ड आहे. त्याशिवाय ही रेल्वे दोन्ही बाजूने चालू शकते. त्यामुळे याच्या दोन्ही बाजूला X ही खूण दिलेली नसते.