‘मंगळ’ विजयाचे स्वर घुमले चोहीकडे
By Admin | Updated: September 25, 2014 10:58 IST2014-09-25T03:57:39+5:302014-09-25T10:58:26+5:30
भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळयान चाचणी यशस्वी झाली. सबंध भारत देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही याची दखल घेण्यात आली

‘मंगळ’ विजयाचे स्वर घुमले चोहीकडे
मुंबई : भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळयान चाचणी यशस्वी झाली. सबंध भारत देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही याची दखल घेण्यात आली. त्याचप्रमाणे बुधवारी मंगळयानाची महती उलगडणारा ‘मंगळयान’ दिवस मुंबई विद्यापीठात साजरा करण्यात आला. या वेळी संपूर्ण मंगळयान मोहिमेच्या प्रवासाची माहिती घेत विद्यार्थ्यांनीही ही अनोखी सफर अनुभवली.
मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात मंगळयान दिवसाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मयांक वाहिया यांनी उपस्थिती दर्शविली होती. याप्रसंगी त्यांनी पृथ्वी आणि मंगळ ग्रह यामधील समानता कशी आहे याचे मार्गदर्शन केले. भारतीय तंत्रज्ञान वापरून मंगळयान पाठविण्यात आले. हे मार्समशिन यशस्वी झाले, अशा प्रकारचे पाच प्रयोग इस्रोने योजिले आहे. हे पाच प्रयोग यशस्वी झाल्यास नासाप्रमाणेच भारतातही स्वतंत्र संशोधनाची सुरुवात होईल. नासाच्या प्रमाणात कमी खर्चात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. भेटीदरम्यान त्यांनी मंगळयान कसे यशस्वी झाले, त्यामागची मेहनत याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय, कौतुकाची बाब म्हणजे विद्यार्थी आणि उपस्थित प्राचार्यांनी मिळून केकसुद्धा कापला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने हाती घेतलेल्या ‘मार्स आॅरबायटर’ या ४५० कोटींच्या प्रकल्पाचा संपूर्ण प्रवास या कार्यक्रमात उलगडला. या वेळी या कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, प्रा. दैवता पाटील आणि डॉ. मंगेश करंदीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)