जयपूर : 'जयपूर फूट' तयार करणाऱ्या 'भगवान महावीर विकलांग सहायता समिती' या संस्थेने १९७५ पासून आतापर्यंत भारत आणि परदेशातील तब्बल २४ लाख दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत केली आहे. संस्थेचे संस्थापक डी. आर. मेहता यांनी ही माहिती दिली. या २४ लाख लोकांपैकी ४७,५२७ परदेशी नागरिक आहेत. त्यांना ४६ देशांमध्ये आयोजित केलेल्या ११६ शिबिरांमधून मदत मिळाली.
अफगाणिस्तानातही शिबिर
- परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या शिबिरात ७५ लोकांना, तर मोझांबिकमधील मापुटो येथे १२३० लोकांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले.
- २ संस्थेचे अध्यक्ष सतीश मेहता यांनी सांगितले की, जगदलपूर, शिलाँग, बाडमेर, हमीरपूर आणि जम्मू येथील एम्समध्येही नवीन केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.
गेल्या वर्षात किती मदत?
- गेल्या एका वर्षात संस्थेने १.७८ लाख लोकांना कृत्रिम अवयव, कॅलिपर्स, ट्रायसायकल्स, व्हीलचेअर्स, श्रवणयंत्रे आणि इतर साधने दिली आहेत.
- संस्थेने सुवर्णजयंती वर्षात अमृतसर व भोपाळ येथील एम्स रुग्णालयामध्ये नवीन शाखा उघडल्या आहेत.
- लवकरच टांझानिया, निकाराग्वा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ग्वाटेमाला, सुदान, म्यानमार या देशांतही शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.