प्रेमविवाहानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून धमकी मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:46+5:302021-07-14T04:20:46+5:30
जळगाव : मामाच्या शेजारी राहणाऱ्या डॉक्टर मुलीशी ओळखीतून सुत जुळलं..त्यातून प्रेम बहरले...त्यानंतर व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारीला तिच्याशी नोंदणी ...

प्रेमविवाहानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून धमकी मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
जळगाव : मामाच्या शेजारी राहणाऱ्या डॉक्टर मुलीशी ओळखीतून सुत जुळलं..त्यातून प्रेम बहरले...त्यानंतर व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारीला तिच्याशी नोंदणी विवाह केला. या प्रकरणाची वाच्यता झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मामा व तरुणाच्या कुटुंबीयाला संपविण्याची धमकी दिली. मध्य प्रदेशातील रतलाम येथे घडलेल्या या प्रकरणानंतर तरुणाने भीतीमुळे थेट जळगाव गाठून विष प्राशन केले. २४ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. चिराग बाबूलाल पांडे (वय २८, रा.शिवाजी नगर) असे या तरुणाचे नाव आहे.
चिराग हा १२ जुलै रोजी जळगावात आला. वडील दुकानावर गेलेले होते. शिवाजी नगर येथील घरी कुणीही नसल्याने दुपारी १ वाजता चिरागने विष प्राशन केले. नातेवाइकांनी तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता चिरागची प्राणज्योत मालवली. चिरागच्या मृत्यूस डॉक्टर मुलीचे कुटुंब व तिच्या भावाचे मित्र कारणीभूत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मामा हेमंत पुरोहित यांनी केली.