नागपंचमीला सापाला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:29+5:302021-08-13T04:21:29+5:30

(डमी १०३९) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात ...

Worship the snake on Nagpanchami, then why punish the snake on another day? | नागपंचमीला सापाला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

नागपंचमीला सापाला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

(डमी १०३९)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात असून, नागपंचमीच्या दिवशी पूजा होणाऱ्या सापांना इतर दिवशी मात्र ठार मारले जात असते. तसेच हे प्रकार वाढतच जात असून, दर दिवसाला अनेक सापांचा मृत्यू होत आहे.

सापांबद्दल असलेल्या गैरसमजुतीमुळे व अनावश्यक भीतीमुळे शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप आता शत्रूसारखा भासत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात जमिनीमधून उष्णता निघाल्यावर व बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक साप हे नागरीवस्तीत शिरतात. साप हे थंड आणि दमट जागा शोधतात. त्यामुळे साप हे मानवी वस्तीत भक्ष्य आणि आसरा शोधण्यासाठी येतात, उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ सुरू होत असतो त्यामुळे एकाच ठिकाणी दोन ते तीन सापदेखील आढळतात. मात्र, नागरिकांमधील असलेले सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार

विषारी

घोणस, मण्यार, फुरसे, नाग, हिरवा चापडा, मलबारी चापडा, सामान्य मांजऱ्या, हरणटोळ, फॉर्स्टनचा मांजऱ्या, तपकिरी हरणटोळ.

बिनविषारी

अजगर, मांडूळ, कवड्या, धामण, नानेटी, त्रावणकोर कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, वाळा, पहाडी तस्कर, कुकरी सर्प.

साप आढळला तर...

१. साप घरात आढळल्यास, न घाबरता शांत राहावे, आपल्या जवळील सर्पमित्रांना कळवावे.

२. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्यावे.

३. लहान मुलांना, पाळीव प्राण्यांना सापापासून दूर ठेवावे, सापाजवळ जाण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करून नये अथवा जवळ जाऊन छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करू नये.

साप हा तर शेतकऱ्याचा मित्र

साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. शेतात धान्याची नासाडी करणारे उंदीर खाण्याचे काम साप हा करत असतो. एकप्रकारे साप शेतकऱ्याची अप्रत्यक्षपणे मदतच करत असतो. मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज व सापांबद्दल असलेली भीती यामुळे सापाला अनेक जण शत्रूच समजतात.

कोट...

जिल्ह्यात आढळणारे ३० टक्केच साप हे विषारी असून, ७० टक्के साप हे बिनविषारी आहेत. मात्र, अनेक वेळा सर्पदंश झाल्यानंतर भीतीमुळेच अनेक वेळा मृत्यू होत असतात. सापांबद्दल अनावश्यक भीती न बाळगल्यास सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूत घट येऊ शकते. तसेच नागरिकांनी काही अंशी खबरदारीदेखील घेण्याची गरज असते.

-बाळकृष्ण देवरे, सर्पमित्र

Web Title: Worship the snake on Nagpanchami, then why punish the snake on another day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.