वीज जोडणीअभावी घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:59+5:302021-02-05T05:54:59+5:30
जळगाव : घनकचरा प्रकल्पासाठी ठेका देण्यात आलेल्या पूर्वीच्या कंपनीकडे महावितरणची थकबाकी असल्याने आता नवीन महापालिकेला नवीन वीज जोडणी मिळत ...

वीज जोडणीअभावी घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले
जळगाव : घनकचरा प्रकल्पासाठी ठेका देण्यात आलेल्या पूर्वीच्या कंपनीकडे महावितरणची थकबाकी असल्याने आता नवीन महापालिकेला नवीन वीज जोडणी मिळत नाही. यामुळे घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे, असा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. त्यावर थकबाकी असल्याने वीजजोडणी देता नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पाच लाख जनतेशी संबंधित हा प्रश्न असल्याने उद्याच वीज जोडणी द्या, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणच्या विविध तक्रारी करण्यात आल्या. यामध्ये जळगाव महापालिकेच्या घनकचऱ्याचाही प्रश्न उपस्थित झाला. यात आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, मनपाने या पूर्वी ज्या कंपनीला घनकचऱ्याचा ठेका दिला होता, त्या कंपनीकडे वीजबिलाची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण आता मनपाला नवीन वीज जोडणी देत नसल्याचे सांगितले. त्यावर महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी थकबाकी असलेल्यांना नवीन वीज जोडणी देता येत नाही. मात्र ही थकबाकी कंपनीकडे होते, मनपाकडे नाही, असे आमदार भोळे यांनी सांगितले. यावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही मनपाचे म्हणणे मांडले. तरीही महावितरणचे अधिकारी नवीन वीज जोडणी न देण्यावर ठाम होते. अखेर पालकमंत्र्यांनी उद्याच नवीन वीज जोडणी द्या, अशा सूचना दिल्या.
मनपाकडे असलेल्या थकबाकीवर कोणी बोलत नाही
आमदार सुरेश भोळे यांनी घनकचरा प्रकल्पासह शहरातील विविध भागातील वीजपुरवठ्याच्या समस्येविषयी मुद्दा मांडला. त्यावर अधीक्षक अभियंता फारुक शेख यांनी महापालिकेकडे सात ते आठ कोटींची थकबाकी आहे, त्याविषयी कोणी बोलत नाही, असे थेट वक्तव्य केले. त्यावर मात्र कोणी काहीच बोलले नाही.
खड्डे बुजवायला पैसे नाही, महामार्ग काय करणार? पालकमंत्री
शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाविषयी अनेक तक्रारीदेखील मांडण्यात आल्या. खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर दरम्यान अनेक अडचणी असून ठिकठिकाणच्या कामांचा समावेश करून नवीन डीपीआर सादर करा, अशा सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी नहीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या सोबतच शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामात अनेक अडचणी असल्याने हे रस्ते मनपाकडे द्या, असा मुद्दा समोर आला. मात्र मनपाकडे पैसे नसल्याने त्यांच्याकडून ही कामे होणार नाही, यासाठी हा रस्ता सा.बां. विभागाकडे वर्ग करा, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. मनपा शहरातील खड्डे बुजवू शकत नाही, महामार्गाचे काम काय करेल, असा चिमटाही पालकमंत्र्यांनी काढला.
१५ दिवसात गाळ्यांचा प्रश्न मार्गी
शहरातील व्यापाऱ्यांचा प्रश्न बिकट असून मनपाच्या गाळ्यांवरही टांगती तलवार आहे. त्यामुळे या विषयी तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक नितीन बरडे यांनी केली. त्यावर आपली चर्चा झाली असून १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा पालकमंत्री पाटील यांनी केला.